Sunday, October 11, 2015

सावध ह्या पुढच्या हाका !

बायकांच्या डोक्यात केमिकल लोचा नक्कीच असावा , खूप दिवस मनातच ठेवले पण आज सांगावेसेच वाटतेय. खुपदा मुलींचे असे असते  की एखाद्या मुलावर प्रेम जडते , मुलगी मनापासून करते , हळूहळू मुलगा तिला सांगायला लागतो - मला तू आवडतेस पण माझ्या घरच्यांना नाही पटणार . मग कोणीच सुखी होणार नसेल तर लग्न कशाला करायचे ? त्यापेक्षा आपण हे तुझ्या किंवा माझ्या  (कोणाचे आदी होईल तोपर्यंत) लग्नापर्यंत चालवत राहू , एकमेकांचे होवून राहू ,(तोपर्यंत मिळणारे फायदे मला मिळूदेत ) असे काहीतरी सांगून मुलींना झुलवत राहतात . मुलीही खुपदा अशी रिलेशन्स चालूच ठेवतात . मनाला समजावत नाहीत -- हे तात्पुरते आहे , तकलादू आहे  किंवा असे सर्व सांगणारी सिस्टीम आपल्याकडे नाहीच . हे मी सांगतीय कारण मी अशी बरीच उदाहरणे आजूबाजूला पाहते . मुलींचे मन मानायला तयारच नसते किंवा ध्यानात पण येत नाही त्यांच्या - ह्या सर्वात आपण स्वतःचे किती नुकसान करून घेतोय . इतक्या त्या मनाने गुंतलेल्या असतात . पुढे व्हायचे तेच  होते - मुले दुसरीशी लग्न करून सर्व विसरून जातात  , मुलीही दुसऱ्याशी लग्न करतात पण जुन्या आठवणींना कुरवाळत बसतात .

   माझा एक मित्र - एका  मुलीबरोबर त्याची तशी…  मैत्री . मैत्री का  काय ते ठावूक नाही पण … त्या मुलीची तो सर्व काळजी घेतो , घेवून फिरतो ,एकत्र  जेवतो , वाट पाहतो …  अजून बरेच काही असेलही पण लग्न -- नाही करणार . म्हणजे असेही नाही कि तो दुसऱ्या कोणत्या मुलीशी लग्न करणार नाही तर दुसऱ्या मुलीशी करणार पण हिच्याशी नाही …  का तर म्हणे त्याची आई फार कट्टर - जातीशी , मग लग्न नाही करू शकणार म्हणे … खुपदा सांगितले अरे आईला मनव की …. पण नाही - म्हणे ह्या लग्नाने जर कोणीच सुखी होणार नसेल तर कशाला करायचे . अरे हो पण मग तिला गुंतवून कशाला ठेवायचे ?( आणि तिने तरी का गुंतायचे? ), तिला तिचे आभाळ शोधू द्यावे ना -- पण नाही … ती माझीच असेल जोपर्यंत माझे किंवा तिचे लग्न होत नाही तोपर्यंत . तिची त्याच्याशी खूप इच्छा लग्न करण्याची पण त्याच्या घरी चालणार नाही … मग ही बिचारी प्रेम विसरू शकत नाही हे कारण सांगून स्वतःच्या मनाला फसवत राहिलीय . हे सर्व पचवण्यासाठी आहेच राधा कृष्णाचे उदाहरण . कृष्णाबरोबर म्हणे राधेचेच नाव घेतले जाते , रुक्मिणीचे नाहीच …  अरे पण राधेचे लक्षात ठेवले तुझे नाही हे कोण समजावणार ?

आपल्याकडे मुलींनी हे  सर्व पटवून देण्याची सिस्टीम नाही …मग दुःख करत बसायचे किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये जायचे , अभ्यास करिअर बंद . मुली खूप अभ्यास करतात चांगले मार्क्स पाडतात पण प्रेमवीराची लायकी नाही चांगले मार्क्स मिळत नाहीत मग ह्या त्याचे सर्व जर्नल्स , नोट्स साठी मदत करणार तोपर्यंत हे वीर सतत सोशल मिडीयावर पडीक (दुसऱ्या पोरींबरोबर गुलुगुलु गप्पा मारत )आणि ह्या राबणार …  स्वताची उन्नती रोखून, नेहमीच पडती बाजू मुलींची हेच जणू पटवून दिलेले असते त्यामुळे मुलीना बायकांना सवयच असते नमते घ्यायची .

आजकाल बायका -- ज्यांना घरात प्रेमाचे दोन चार शब्द मिळत नसतात त्याही अशा प्रेमविरासाठी वेड्या असतात , समोरचा पुरुष - मी तिला आधार देतोय ह्या गोंडस नावाखाली तिच्याकडून सर्व फायदे वसूल करत असतो  आणि ह्या बायका तो आपल्यावर किती प्रेम करतोय म्हणून …उतावळ्या असतात . जे बोलू नये ते बोलत असतात …  मागे हा वीर तिचे सर्व आंबट गोड मेसेज आपल्या मित्रांना फोरवर्ड करत असतो . बाईला ह्याचा पत्त्याच नसतो आणि वर सांगत असतो … बाईला अक्कल नको  हे सर्व करताना …? तिला पण ह्यात आनंद मिळतोय … मी तो तिला  देतोय… अरे हो पण चार चौघांना सांगून तो माणूस तिची चार माणसात इज्जत घालवतोय त्याचे काय ?

ह्या बायका मुली आडाणी नाहीतच - तर चांगल्या शिकल्या सावरलेल्या , कमावत्या  असले काहीच बिरुद चिटकवून त्यांना वेगळे करता येत नाही -- म्हणजे काहीतरी केमिकल लोचा आहे . कसा सावरावा तो? ? सावध ह्या पुढच्या हाका ऐकायला मदत करेल का ?


No comments:

Post a Comment