Thursday, April 30, 2015

बहर १

तीन दिवसाचा विकेंड होता पण वरच्यांना आमच्या सुखाचा हा बहर  कधी बघवतच नाही आणि शनिवारी प्रोजेक्ट रिलीज करावे लागले … करणार काय झकत काम केले सुट्टी दिवशी . एवढी धावपळ करून होळी नळी साजरी करायची म्हणून आणि लेक आईकडे सुट्टीला गेलीय म्हणून रविवारी आईकडे . रविवारी यायचे ठरवले पण लेकीची डिमांड -- २४ तास तरी काढ माझ्याजवळ ….लेकीच्या ह्या आग्रहाच्या बहरावर मान तुकवून …  पुन्हा रात्रीच्या आणि सुट्टीच्या झोपेच्या बहराला कात्री लावून चार वाजता उठून , आवरून  भावाला उठवून थंडीत साडे पाचला पेठनाका गाठला . एक जीपवाला आला , सर्व पुरुष त्यात चढले , भावाला चौकशी कर म्हणाले . तो गाडीवाला म्हणतोय , सर्व जेन्ट्स आहेत हो , मग एकच लेडीज नको . असुदे बाबा म्हणाले . मग गाडी आली --मिरज नाशिक . शिवाजीनगर पर्यंत जाणार म्हणून आणि साताऱ्यात जाणार नाही माझ्या आनंदाला खूपच बहर आला , आता ऑफिस ला वेळेत पोहचणार  आणि अप्रेझल ची मिटिंग गाठता येणार म्हणून कोण कौतुक . पण नंतर कंडेक्टर ने गाडीला सुपर फास्ट ते जनता गाडी बनवली . सातारा सोडून प्रत्येक हायवे वरच्या गावात बस थांबली . १५ मिनिटे फ्रेश होण्यासाठी थांबली …
असुदे म्हणाले -- ड्रायवर फास्ट चालवतोय --- पुण्यात ९ वाजता एन्ट्री ,स्वारगेट ला पोहचायला १० … हाय रे ट्राफिक चा बहर , शिवाजीनगरला पोहचायला साडे दहा … घरी पोहचायला ११ आणि कंपनीत उशीर नेहमीसारखाच …

पण गर्दीच्या ,ट्राफिक च्या बहरपेक्षा पूर्ण गाडीतून रस्त्यावर विविध फुलांचे जे बहर पहिले त्यावर उद्या … 

Tuesday, April 28, 2015

आठवणींचा हिंदोळा



होतास जेव्हा मिठीत
वचने हजार दिलीस
सुटली जेव्हा मिठी
मोडून सर्व गेलास

कशास खोटया शपथा
गोड शब्दांच्या ह्या बाता
कळते जरी मनाला
तरीही सुटतोच ताबा

असाच हा भुलय्या
भूलावितो मनाला
झुलवितो तनाला

शेवटी फक्त आठवणींचा हिंदोळा

Monday, April 27, 2015

गाई ,म्हैशी ,डुकरे ,कुत्रे ,मांजरे आणि खड्डे



   गाई ,म्हैशी ,डुकरे ,कुत्रे हे सजीव आणि खड्डे मध्ये आले कि काय जीवाचे पाणी पाणी होते ते त्यावेळीच ठावूक . अगदी आज सुद्धा रस्त्याने गाडी चालवताना ह्यांची फौज मध्ये आली कि झाले --जे व्हायचे ते होतेच , तोंडचे पाणीच पळून गेले म्हणून समजा . माझ्या तर जीवाला नुसता घोरच लागतो . अगदी लांबून म्हणजे पाच सहाशे मीटर वरून जरी मला हे दिसले कि झाले माझ्या गाडीचा स्पीड आलाच दहावर . चांगली गाडी धावत असताना ,मागच्याला ओव्हरटेक केले असताना ह्या बाईला मध्येच गाडी स्लो करायला काय झाले म्हणून मागचा अचंबित होत असणार हे अगदी नक्की . हा ,तर काय एवढे कारण भिण्याचे . कुत्र गाडीच्या आडवं येवून आमचे बंधुराज चांगलेच पडले होते , कसं आडवं आलं कुत्रं हे काही बंधुराजांना सांगता येयीना --शेवटी मीच कुत्र्याला आडवा आलो आणि असा हॉस्पिटलात आडवा झालो एवढेच सांगत होते . तसेच अगदी बहिणाबाई कुत्रा गाडीच्या आडवा आला म्हणून पडल्या होत्या आणि जे काही व्हायचे ते झालेच . चांगले लग्न ठरून फक्त दोनच दिवस झाले असतील, मग फोनवर बोलण्याच्या नादात (होणाऱ्या नवऱ्याबरोबर ) का अजून काही --ते माहित नाही पण कुत्रं आडवं आलं आणि बहिणाबाई पडली . चांगला गुडघा ,हनुवटी,कोपरे फुटले होते आणि गाल सोलतुन लाल झाले होते . लाजून लाजून लाल होण्याचे मात्र टळले तेव्हा . अजून एक मित्र -रात्री उशिरा घरी चालला होता तर कुत्र्यांची जत्रा अक्षरशा: मागे लागली  आणि मग त्याला चांगलाच चेव आला आणि मग सरळ बाईकवरून उतरून दगड घेतला बाबाने . मस्त भिरकावला … एकाला लागला पण बाकीचे सैन्य जे काही चवताळून उटले की … पळता भुई थोडी झाली आणि अशी काही गाडी स्लीप झाली कि पहिला मोठा नाला आणि नंतर हॉस्पिटलच गाठावे लागले .
   माझा स्वतःचा अनुभव तर काय सांगू -- मस्त गावाकडे गेले होते ,तर आईचे घर आहे गावाबाहेर म्हणजे शेतात म्हणा ना आणि वाडा आहे गावात . तर चांगले २ -३ किलोमीटर अंतर . आईचे घराशेजारी ,म्हणजे थोडा अंतर आहे,तिथे एक धाबा आहे . मग काय नुसता मांसाहार जेवायला दहा बारा तरी कुत्री तिथे आहेत . गावात गेले होथे वाड्यात . परत येताना आय टी आय च्या स्टोप समोर उतरले . आता पक्की पुणेकर झाल्याने मस्त रुमाल बांधला होता.सर्व नाक कान ,चेहरा झाकून ,नुसते डोळेच उघडे पण … मग काय ह्या कुत्र्यांना वाटले असेल बहुधा --आला अतिरेकी   . झाली यांची झुंड माझ्या मागे अशी काही लागली कि बापरे . मी बिचारी बापडी ,"हाड sss हाड ssss " . घशाला नुसती कोरड पडली पण कुत्रे काय हलायचे नाव घेयीनात . आता मला फाडून खाणार असे वाटले पण रुमाल काही काढायचे सुचले नाही . कुत्र्यांचा आवाज ऐकून आय टी आय मधला एक माणूस बाहेर आला … त्याने कुत्र्यांना हाकलले आणि म्हणाला, "रुमाल सोडा आदि !". हाय रे कर्मा -- काढला रुमाल . घामाने नुसती डबडबले . थोडेच पुढे गेले कि परत भुंकू लागले . शेवटी एस टी थांबली . तोपर्यंत आमचा टायगर आला (भावाने पाळलेला कुत्रा ), त्याने मग सगळ्यांवर भुंकले आणि फौज पळाली . त्याने तंबी दिली असेल बहुदा , का शिव्या हासडल्या कोणास ठावूक -- बहुतेक असे असेल --"ताईसाहेब आहेत आमच्या ,चालते व्हा हरामखोरानो … " , तोपर्यंत टायगर का भुंकतोय म्हणून आई,काकी ,आजी ,अण्णा बाहेर आले . एवढ्या वेळ भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाजच आला नसेल बहुतेक साऱ्या घरातल्यांना ,नशीब टायगर चा तरी आला … " माझी अवस्था पाहून आई धाबेवाल्याला शिव्या घालायला लागली … शेवटी सर्व किस्सा आणि रुमालाचा पराक्रम ऐकून आई मलाच म्हणाली ,"नाही ती थेरं करायची , हि सगळी तुमच्या पुण्यात कर बाई ,तिकडच्या कुत्र्यांना सवय असल . "

  झाले आता गावाकडे रुमाल घेवून जायचेच बंद केले आहे . इति कुत्रा पारायण . पण बाकी प्राण्यांनी  पण मला बरेच पिडलय ते पुढच्या लेखात …

 मागच्या लेखात कुत्र्याबद्दल सांगितले , अजून काही सांगतेच . आमचा टायगर गाडीखाली येवून मेला पण त्याला आमच्या घरच्यांनी साग्रसंगीत पुरला , त्याचे मेल्यानंतर चे सर्व विधी केले , नैवेद्याला त्याच्या आवडीचा टोम्याटो ,मटण आणि बरेच काही काही ठेवले होते ,माझा चुलत भाऊ एक दिवस पुण्याला न येता कंपनीला दांडी मारून राहिला होता , माझ्यासमोर फोनवर रडला होता ,घरी गेले तेव्हा कावळ्याने पटकन "टोम्याटो " च उचलला हे काकीनी घरी गेल्यावर मला सांगितले .

नुसत्या तेवढ्यावरच हे कुत्रा पुराण नाही तर पुन्हा घरात दोन कुत्री त्यांनी पाळली आहेत आणि आत्यांच्या मुलाला देण्यासाठी एक (ते नंतर दिले ), अशा तीन कुत्र्यांसाठी आई आता भाकरी बडवते म्हणून मला राग येतो . मी भावाला सारखी म्हणत असते ,"तुझी बायको आली कि एक दोन नाहीत तर हजार कुत्री पाळ पण आता नको "

 दुसरी घेऊ म्हैस , ह्या म्हैशीनी तर लहानपणापासून मला त्रास दिलाय . अगदी लहान होते तेव्हा सुट्टीत माझ्यावर अगदी भयंकरच प्रसंग ओढवून ठेवला होता . तर काय आहे --माझ्या आईकडे गावाला लागुनच एक अगदी शेत आहे ,शेरी म्हणत्यात त्या शेताला , दोन दोन शेऱ्या -खालची आणि वरची .दोन्ही शेऱ्या एका पानंदी ने विभागल्या होत्या . वरच्या बाजूला असणाऱ्या जे थोडे वर आणि उंच होते ती वरची शेरी ,मग पानंद आणि मग खाली खालची शेरी . खालच्या शेरीच्या बाजूने  ओढा व्हायचा , पाणी खूप होते तेव्हा त्या ओढ्यात म्हणून गावात कित्येक पूल बांधले (प्रत्येक गल्लीत एक) कारण ओढ्याच्या पलीकडे १/४ गाव आणि सगळी महत्वाची कार्यालये . शाळेत जायचे ,कचेरीत जायचे अजून हजार कामासाठी तिकडेच जायचे .पण पूल बांधल्यापासून ओढ्याचे पाणीच गेले . आता नुसत गारवेल आणि अक्क्या गावची गटार गंगाच वाहते . पावसाळ्यात मात्र पाणी असतेच . ते जावूदे पुलांची गोष्ट  .
 तर एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आमच्याकडे असणाऱ्या एका गड्याने -हणम्याने म्हैस नेऊन बांधली . खालच्या शेरीत वरच्या बाजूला खूपच मोठा बांध होता ,तिथे गवतच यायचे नुसते . मग एक खुंटा रोवून तिला लांब दोरीने बांधायची आणि मग ती गोलाकार परिसरात चरायची .
   हा तर तो सकाळी म्हैस बांधून आला . बाकीचे घरातली पुरष माणसे गेली इकडे -तिकडे (कामधंद्याला नाहीतर चकाट्या पिटायला ). संध्याकाळी," हणम्या  मेला म्हशीला घेवून आला नाही वाटत ",म्हणून आजी शिव्या देऊ लागली . पण एकही मुलगा जवळ नाही म्हणजे आजीचा मोहरा माझ्याकडे - "जा  ग तेवढी पळत पळत , म्हैस सोडून घेवून येशील का ?"  नाही ,आता रात्र झालीय … मी नाही असे म्हणू लागले . घरात ३ बायका -आई ,आजी आणि काकी पण त्या कशा जाणार -- खानदानी बायका रानात जात नाहीत … (ह्या खानदान नावाच्या राक्षसाने माझी पाट कधीच सोडली नाही पण ते नंतर ).
   मग शेवटी आजीने हजार गोष्टी सुनावल्या ,खायला देते आणि काय काय … शेवटी एकदाची तयार झाले . "राम राम ", म्हणत मी शेताचा रस्ता धरला ,पोटात भीतीचा गोळा उठला पण पर्याय काहीच नव्हता, गाव संपेपर्यंत काहीच वाटले नाही पण नंतर फारच भीती वाटू लागली , मग शेताजवळ असणाऱ्या घराजवळून परत महादेवाच्या देवळापर्यंत परत आले ,चुलत आजोबांनी मला पहिले आणि म्हणाले एवढ्या रात्रीची (म्हणजे ७ वाजता ) इकडे काय करत आहेस , सगळा वृत्तांत आजीच्या शिव्यांसकट सांगितला , आजोबांनी पण हणम्याला  चांगल्या दोन शिव्या हासडल्या आणि परत माझी वरात शेतावर … परत माझे राम राम चालू झाले ,आजोबांच्या लक्षात आले . "अगं इथं भुतं -खित नाहीत ,त्यासनी माहिती आहे ,बाळासाहेब असतोय फक्त इथ रात्रीचा मग जावून काय उपेग न्हाय ,तर घाबरू नगस पण तुला राम राम म्हणयच असेल तर निवांत म्हण ,असं कुत्रं मागं लागल्यागत नगो " , झाली म्हैस घरात आली ,आजोबांनी गोठयात बांधून सुशीला बाईंकडे (आजीकडे )मोर्चा वळवला ,सोप्यातून जोराची हाक ,"वाहिनी ssss "
आजी हातातला काम हातात ठेवून ,लगबगीन सोप्यात आली .
"हणम्या मेला असला तर मरू दे ,पण बाकीची पण मेलीत काय घरातली ? पोरगीला पाठीवलय शेरीत ते पण एवढ्या रात्तच "
आजी नुसतेच माझ्याकडे बघत ,"अहो ते … "
"मला काय बी सांगू नगा ,हिला उतरता येतंय व्हय वरच्या शेरीतन पांदित ?,पुन्हा हिला शेतात पाठीवलीसा तर याद राखा ,म्या दादांच्या संग बोलून म्हशीचा बाजार करायला सांगतो  "

आजोबा गेल्यावर आजीचा पट्टा चालू झाला …

नंतर कॉलेज जा जाताना मध्ये एका गावात सकाळी म्हशीच म्हशी सोडलेल्या असत, त्या डोंगराकडे चाललेल्या असत , निदान पंधरा मिनिटे तरी बसला थांबावे लागे . कितीतरी वेळा बसच्या हेडलाईट त्यांनी शिंगे घुसवून फोडलाय .

सगळ्यात भारी -- मी जेव्हा मुंबई अहमदाबाद ह्या हायवेवरून वापी ते दमन उप डाऊन करत असे ,त्या रस्त्यावर म्हशी -गवे आडवे येवून भारी भारी गाड्यांचा अक्सीडेंट झालेला मी पाहिलाय ,ओरखडाही पडलेला चालत नसलेल्या मालकांची तोंडे तेव्हा बघवत नसत .

अजून पण ह्या म्हशीनी माझा पिच्छा पुरवलाय ,रोजच ऑफिसच्या रस्त्यावर (पिंपळे -निलख ते बालेवाडी ) मध्ये नदीवर किंवा मिलेटरी च्या मैदानात चरायला नेत असावेत . अशा काही रस्त्यावर धुडगूस घालतात कि बास . एकदा अशाच चार पाच गाड्या थांबल्या ,मी पण मागे थांबले , चार चाकी वाले आत सुरक्षित . पुढे काय चाललंय याचा अंदाज येईना , एक एक गाडी निघाली ,मी पण निघणार एवढयात म्हैस माझ्या गाडीकडे पळत येत होती ,काय सुचेना ,आता नक्की शिंग खुपसणार आणि आपण मरणार असेच दृश्य डोळ्यासमोर आले . गुराखी मागून म्हशीला मारत पळत होता . मी जोरात ओरडले , म्हैस माझ्या गाडीच्या अगदी जवळ आली . गुराखी म्हशीला मारायचे थांबून माझ्यावर जोरात ओरडला ,"ओरडू नगा ,तुमच्याकडे येत नाही ती "

"अफझल खानसारखा कोतळा बाहेर आल्यावर ओरडणार कशी ?", सगळ माझ्या मनातच बोलले … आणि गाडीचा वेग वाढवला







आठवणी


कोंब ते कणीस कित्येक पदर
कोवळे ते जून चढती अस्तर
एकट्या दुकटया धरतात फेर
फुल ते निर्माल्य संपे सरणावर

सुखाची दुःखाची एकेक किनार
सुखाची मिरवते दिमाखात पदरावर
दुःखाची ठेवली कोंबून उरात
सुरकुत्या घड्या तीस हजार

सुखाच्या दुःखाच्या ह्या उतरंड्या 
ठेवल्या जपून मनात कांडया
मनाच्या तळाशी ठेवल्या बांधून
तरीही उलतात जखमा खांडून 

जगतात त्या सुखलेल्या पिंपळपानात 
फुलतात त्या मोरपिसात 
अडकतात त्या फोटोच्या चौकटीत 
चढतात त्या शेवटी भिंतीवर  

Sunday, April 26, 2015

कातरवेळ

का अशी ही कातरवेळ
निघेचना हा पळ
आसवे डोळ्यात हजर
चुकवून साऱ्यांची नजर

मन हे दोलायमान
रिते रिते हे भान
कालवा ना गोंगाट
तरीही भीती अफाट




डोह


खोल खोल अंतरंग
उठती हलकेच तरंग

निरव शांतता अढळ
न गाठता येई तळ

अस्तित्व त्याचे पाणी
सावल्यांची काळी जाळी

पाण्यास आकार तोच देई
पाण्याविना अस्तित्व काहीच नाही





कशी विसरू तुला ?



पाहून माझे छुमछुमते झुबे
स्मरण होते मजला तुझे
नसे तो वर्ण धमक पिवळा
मधूनच दिसतो  शुभ्र पांढरा

नसे तो आवाज किनरा
परी स्पर्श तो मऊ हसरा
नसे जपण्याची व्यर्थ काळजी
असे हजर नाजूक पाकळी

किती केल्या मी तुझ्या कुडया
कानात बसवल्या त्या बुगडया
दुमडून पाकळ्या केल्या अंगठया
रुतवून काटा बसवल्या फिरक्या

कशी विसरू मी चाफ्या तुला
बालपणीच्या ह्या गोड खुणा


चुका

आयुष्यात मी केल्या काही चुका
त्याचाच हा मार आहे मुका
दिसतात ना त्याच्या काही खाणाखुणा
पण लागल्या जिव्हारी ह्या वेदना

कळसूत्री बनवून गेल्या ह्या जीवना
नाचविती मला ह्या रात दिना
राहिल्या ना दोऱ्या माझ्या हाता
राहिला ना अंत माझ्या आकांता

तोडिले मी बंध ह्याच पाया
सुधारती ना तरी माझ्या आयुष्या
ठरविते मी नाही पुन्हा करायच्या
पण छळतात त्या जुन्या सावल्या

लावतात ह्या दृष्ट साऱ्या सुखा
तळ्यात मळ्यात मग न चुकता
दुख: आहेचि मग  साऱ्या जीवना
पुरवितील  पिच्छा अंतिम  समया


©ज्योती  पवार 

Tuesday, April 14, 2015

वाळवण

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीतले सगळ्यात नावडते काम असायचे ते म्हणजे घातलेल्या वाळवणावर लक्ष ठेवायचे . त्यातल्या त्यात धान्य वाळत टाकल असेल तर खूपच कंटाळवाणे वाटत होते .कंटाळवाण वाटायचं कारण म्हणजे एका जागेला बसून राहण्याचं .काठी आपटत राहण्याचं . थोडा वेळ बाकी मैत्रिणी काय करतात म्हणून फिरून यावे तर चालायचे नाही . कारण तोपर्यंत वाळवणात कुत्रं , डुक्कर यांनी कोणी तोंड घातलं तर मग काही खैर नसे .
    सगळ्यात मजेचा भाग धान्याची पाटी भरून दिली कि ती बाहेर नेहून ओतणे . त्यांचे मजेशीर ढीग बनवणे . ते पसरवणे . हातानेच त्यातून नक्षी काढणे . बाकी त्यातून चालून जाताना  होणाऱ्या गुदगुल्या अविस्मरणीय . गव्हाची तांबूस , जोंधळ्याची पिवळसर , तुरींची लालसर , हुलग्याची काळी छटा . मला नाही वाटत ह्या छटा कोणत्या रंगातून कागदावर उतरवता येत असतील . हौद , कणग्या झाडायला त्यात लहान असल्यामुळे लहानशी केरसुणी घेवून उतरायचे . आतून हौद झाडताना हौदाचा मारून आवाज करायचा . कोणीतरी उचलून अलगद आत सोडतानाची मजा खरच औरच होती . गोल गोल कणग्यातून त्यांना झाडताना त्या गोल फिरायच्या मग तर मज्जाच मज्जा .  अंगाला खाज सुटतीय म्हणून गार पाण्यात बराच वेळ पाण्यात खेळायला मज्जा यायची . पण उन्हात बघत बसायचे जीवावर यायचे, मग काहीतरी चांगले खायचे आमिष दाखवून बसवले जाई . चांगले म्हणजे काय तर चिरमुरे , फुटाणे , जांबळे , करवंद , कैऱ्या , गाजरे , भाजलेल्या पापड्या , पापड , गुळ शेंगा . कधीतरी पन्हे , लिंबाचे सरबत . चिंचेचा गोळा , फारतर फुकण्या (बॉबी पाच पैशाला एक मिळायची , चार आणे ), कधीतरी गारेगार , बर्फाचा गोळा किंवा खेळायला गजगे . पण त्यात स्वर्ग दिसायचा . एवढ्या आमिषावर दिवसभर काचा कवड्यांचा खेळ मांडून किंवा गजगे खेळायला बसायचे . संध्याकाळी पुन्हा ती वाळवणे काढताना आई सर्व चाळायला लागायची त्यात पण एक मज्जा . पण सांडलेले धान्य वेचताना …अबब नकोच हे असे वाटून जायचे .

सगळ्यात भारी वाळवण कुरडया, पापड्या, सांडगे, शेवया यांची . निम्म्या अधिक खावून संपवायचं  . सकाळी सकाळी उकळत्या पाण्यात आईने कुरडयाचा चिक घातला कि पांढराशुभ्र गोळा होईपर्यंत वाट बघायची की वाट्या घेवून शिजवलेला चिक खायला यायचं . आईची पाठ चिक हाटून भरून आलेली असायची आणि  आमची पिठ खाण्यासाठी घाई . मध्ये मध्ये लुडबुड नको म्हणून आई वाटीत पीठ घालून रिकामी व्हायची . आदीच फ्रॉकच्या ओठयात शेंगा घेवून यायच्या मग ते पीठ आणि शेंगा फस्त करायच्या . तांदळाचे सांडगे , शाबुच्या पापड्या तर वाळत घातल्या कि करपलेला सांडगा खाते ग म्हणत फस्त करत राहायचे . ज्वारीच्या पापड्या साडीवर घातल्या जायच्या  त्या संध्याकाळी शिडीवर उलट्या टाकायच्या वरून पाणी मारून मग हळूहळू सोडवून घ्यायच्या आणि त्यातल्या बऱ्याच तोंडात जायच्या . आईने गहू, ज्वारी भिजत घातल्यामुळे जो वास यायचा तो नको वाटायचा . पण एकदाका पीठ शिजायला पडलं की अगदी कधी एकदा पोटात जातंय असे व्हायचे .
   पापडाचे पीठ तर बाप रे टाळ्याला चिकटत मठ मठ गिळलं जायचं अक्षरशः . सांडगे करायचे असतील तेंव्हा तो तिखट आणि लसुन कोथीमबिरीचा
वास नाकात साठला जायचा . सकाळी लवकर पाटावर , मोठ्या पातेल्याच्या झाकण्यावर सांडगे तोडायचे . अगदी बारीक बारीक . पाच मुटके करून ते आदि पुजायचे . त्यात कांदा घालून डांगर करायचे आणि डांगर भाकरी खायची . दोनदिवस वाळताना सांडगे खायचे आणि दुसऱ्या दिवशी नवीन सांडग्याची भाजी आमटी . फणसाच्या बिया घालून सांडग्याची आमटी … लाजवाब . आता तोंडाला पाणी सुटले .

शेवया गहू वलव्हने ते त्याचा मैदा रवा वेगळा काढून … पाट मांडून … शेवया वळणे आणि ताटात गोल गोल चाळने … गल्लीतल्या बायकांचा गलका , चेष्टा , मस्करी . दुपारी मिळणारा सरबत . नुसत्या एक ग्लास सरबतासाठी दिवसभर शेवया चाळायच्या . सुंदर गोलगोल चाळले कि मिळणारी वाहवा . उन्हात घातलेले ताट न मोडता सुटे करणे .

एक एक गोष्ट आठवली की अजून मन बालपणात रमते आणि आईच्या कमरेचा काठा ढिला होवूनही वर्षभर काहीबाही खाता यावे म्हणून ती करत असे … हे आता कळतंय .