Thursday, May 21, 2015

ब , बळीचा

ब , बळीचा
राजन गवस
पॉप्युलर प्रकाशन
  ब  बळीचा ही कादंबरी नाहीच . हजारो शेतकऱ्यांचे जीवन , व्यथा , घालमेल , मरणप्राय जगणं ह्याची जिताजागता अनुभव आहे . छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय आटापिटा त्याला करावा लागतो तो शेतकरीच जाणे . लहरी हवामान , सावकारी पाश . कमी कमी होत चाललेली जमीन  आणि जगण्याची कसरत ह्यातून व्यक्त होते . शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात पण सरकारी नोकर त्या  कशा श्रीमंत शेतकऱ्यालाच मिळवून देतात आणि निर्लज्ज कोडगे तो लाभ कसा उठवतात ह्याचे हुबेहूब वर्णन आहे .
   कोल्हापूर भागातली भाषा हे ह्या कादंबरीचे बलस्थान . एक नंबर जमलीय . प्रत्येक वाक्यागणीस "झ" ने चालू होणाऱ्या शिव्या मात्र ह्यात आल्या नाहीत हे विशेष .
 ही एका भांड्याच्या दुकानदाराने सांगितलेली "कोणेकरी " ह्या त्याच्या मित्राची कथा आहे , कि तो हरवल्यानंतर त्याची शोधमोहीम आहे का ?, कोणेकऱ्या ने लिहिलेली  चित्रपट कथा आहे का ?, तो सांगत असलेली शेतकऱ्यांची व्यथा आहे का अजून काही ?
 असंख्य कथा, उपकथा , नोंदी , चित्रपट कथा , जोतीरावांना पत्रे असे सर्व काही ह्या कांदबरीत आहे . लेखक ह्यात आपल्याला गुंतवून ठेवतो . एकाचवेळी हजारो गुंते सोडवायचा हा प्रयत्न आहे . पण हा गुंता काही सुटत नाही उलट त्यातच आपण अडकून  जातो . त्यातून सुटका नाहीच .

जोतीरावांना पत्रे :
हा ह्यातील अतिशय मार्मिक पत्रे . ह्यात कोणेकरी  महात्मा फुल्यांना पत्र लिहित आहे आणि नकळतच तुम्ही शिक्षणाची दारे बहुजनांना खुली केली त्याचे काय परिणाम झालेत हे सुनावतो आहे . पूर्वी आणि अजूनसुद्धा बहुजन समाज ब्राम्हण समाजाला आपल्या अधोगतीसाठी जबाबदार धरत आलाय पण सर्व शिकून सवरून प्रत्येक माणूस कशी फक्त स्वताची प्रगती करत आहे ते सांगत आहे . हा फायदा उठवून घेण्यात कोणतीच जात मागे नाही .
  सरकारी शिपायापासून ते अधिकाऱ्या मार्फत कसे पैसे खाल्ले जातात आणि त्याचे पाप मार्जन हे अधिकारी कसे करून घेतात हे वाचून देव पाण्यातच बुडवावे वाटतात .
 ह्या पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्या त बायकाही कमी नाहीत . त्यासाठी दिलेले उदाहरण "सौदामिनी खुरकुले" (नावात काही साम्य दिसतंय का हो ?) ह्या तहसीलदार बाईचे उदाहरण एकदम मस्त. आता ह्या बाई कोणत्या पदावर पोहोचल्या असतील ?

चित्रपट पटकथा : दारूवाला आणि त्याची मैत्रिण मिळून कोणेकरी कडून एक चित्रपट कथा लिहून घेत आहेत . त्यातला नायक आडव्याप्पा हा शेतकरी , त्याची बायको तायव्वा , मुले -सुमी आणि केरु , शिवाय जिवबा दानावडे , तात्या पाटील ,आबा नरसाळे , संतू खवीस आणि अशा असंख्य पात्रांनी भरलेली ही कथा . शेती हि नायिका .कथा फिरते ती शेतीवर आणि त्यांच्या जगजीवनावर . ती घालमेल पोहचते . स्वतःलाही ह्या पात्रांचा एक हिस्सा व्हावेसे वाटते . गावाकडे , खेड्यात ज्यांनी आयुष्य काढले त्याला तर ह्यातून सुटका नाही . चित्रपट आणि खरे जीवन ह्यात हजारो मैलांचे अंतर आहे हेच सिध्द होत राहते

शेतातला बारकावे , शब्द (घात , टपणे , पाणी लावणे , भांगलन असे बरेच …) , कष्ट , गाव , परस्पर संबंध , नाती , शहरी आणि ग्रामीण अशी नात्यांची विभागणी ,अचानक आलेली दुखणी , सहकारी सोसायट्या …काय  काय सांगू ?

नोंदी :
कोणेकरी  आपल्या घरचे , स्वतःचे नोकरीतले , भांड्याच्या दुकानात बसून जे जे अनुभव जगतोय ते नोंद करून ठेवतोय . त्या नोंदीतून स्वतः सरकारी अधिकारी असूनही पैसे न खाता राहिल्याने कसा जगत आहे , नातेवाईक काय अपेक्षा करतात . अशी घालमेल नितांत सुंदर उतरलीय . त्याचे जंगलाविषयी ची ओढ , धनगरे , त्यांचे ज्ञान असे असंख्य गुंते  आणि त्यांचे  पैलू ह्यात आहेत .


पण ह्या सर्व गुंत्याना उत्तरे नाहीतच , फक्त आपण त्यात अडकायचे .  त्यात गुंतून ठेवायला लेखक आपल्याला भाग पडतो . ही घालमेल जशीच्या तशी उतरते आपल्यात . त्यातून सुटका नाही .

Wednesday, May 20, 2015

पानगळ

पिवळसर धुसर धुरकट
रुक्ष असोनि नसे कटकट

हिरवाईचा नसे मागमूस
 तरीही रूप दिसते राजस

जीवास असते धाकधूक
पर्णसंभार अगदीच तुरळक

सृष्टी चे  हे चक्र मानून 
सहतो आम्ही हे जीवन

नाही तक्रार अन  किरकिर
होता सुरु ऋतु शिशिर 

आजी आजोबा

शनिवार , निवांत कामे आटपून पुस्तक वाचत बसले होते . तोपर्यंत काही तरी गडबड गोंधळ बाहेर चालू असल्याचे ऐकले  म्हणून बाहेर डोकावले . तर दोन तीन माणसे समोरच्या आजोबाना धरून बाहेर आणत होती . आजोबा नीट स्लीपर ही घालू शकत नव्हते . कसेतरी एकाने स्लीपर त्यांच्या पायात चढवले . आजी मागून एक एक सूचना करत होत्या . आठ दिवस झाले चक्कर मारते आहे . ज्या दिवसापासून हा त्रास चालू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी दवाखान्यात घेवून गेले होते . पण काही फरकच नाही . आता त्यांना अजिबात चालता येईना . बाथरुमला पण जाता येईना . रवीवारी पडले .
आजी आजोबांना जीना उतरायला चालू करोपर्यंत ह्या सूचना देत होत्या .

मी खाली येवू काय असे विचारत होत्या . समोरच्या माणसाने नको म्हणे पर्यंत ह्या सूचना चालू होत्या .माणसे जीना  उतरून खाली गेल्यावर आजी ग्यालरीत उभ्या राहून आजोबा कसे गाडीत चढतात त्या पाहत होत्या . मी तेव्हापासून त्यांच्याच बरोबर होते .

गाडी गेल्यावर मला त्यांनी पूर्ण पुन्हा सर्व सांगितले . म्हणाल्या दुपारी दोनपासून सर्वाना फोन लावतेय .तेव्हा आता सातपर्यंत हे लोक जमा झाले . मला तशी बटणे दाबता येत नाहीत , हात थरथरतात . आजोबाच फोन लावतात , पण त्यांना जमेना म्हणून एवढा वेळ . पाहुणे म्हणजे सुनेच्या बहीणीचा मुलगा आणि तिच्या आत्या बहिणीचा नवरा आहे असे सांगितले .
आजींची थरथर वाढली होती . घशाला कोरड पडत होती . मला काय करावे ते सुचेना . मग न राहवून आजींना विचारले . मुलांच्या जवळ का राहत नाही . आजी म्हणाल्या काय करणार -एक मुलगा तिकडे अमेरिकेत , जावून त्याला २० वर्षे झाली . वर्षातून एकदा येवून सर्व सोय करून जातो . दर रविवारी फोन करतो .
मग मी म्हणले , दुसरा मुलगा . आजी कचरतच म्हणाल्या . दुसऱ्याकडे जावून इथे पुण्यात राहिले असते पण तो कधीतरीच येतो नाहीतर गावाकडे असतो . बहुधा त्यांची सून आणि नातू राहत असावी इथे पण पुढे काही बोलल्या नाहीत .

पुढे मग म्हणाल्या , मला बिपी,डायबेटीस , अञ्जिओप्लास्टी  झालीय . मोठ्या मुलाचा चांगला फ्ल्याट आहे इथे तीन बी एच के चा . पण आम्हा दोघांना एवढा मोठा काय करायचा म्हणून तो भाड्याने दिला आणि इथे २ बी एच के भाडयाने घेतला . नेहमीच्या रिक्षा वाल्याला फोन करतो . मग तो नेतो आम्हाला दवाखान्यात . पैसे जातात पण फोन केल्यावर तो येतो. आज केला होता पण तो कोठे बाहेर गेला होता .

मुलगा जेनेटिक सायंटीस्ट आहे . त्याची बायकोही तिकडे सर्विस करते . नातू  आता पी एच डी करतोय , एक गावाकडे आजोबांनी जो जमीन जुमला घेतलाय तो धाकटा  मुलगा सांभाळतो .

एकूण काय तर सदया आजोबा अद्मित केले तर त्यांच्या जवळ कोणी नाही . आजी आजोबाना व्हिसाही मिळत नाही . कारण त्यांचे वय जास्त आहे. धाकटा मुलगा गावाकडे राहतो त्यामुळे दवाखान्याच्या सोयी नाहीत . दोघाही मुलांना मुलगी नाही . नाहीतर बिचारी इथे आजी आजोबांना सोबत राहिली असती .

आजी हताशपणे म्हणाल्या , सर्व असून काही उपयोग नाही . एखादी मुलगी असती तर चार दिवस माहेरला येवून राहिली असती . चटक्यात सोनू म्हणाली मी तुम्हाला फोनचे नंबर लावून देईन . चहा पाणी गरम करायचे असेल तर करून देयीन . आजी डोंट वरी . मी घरी असले कि तुम्ही बिनधास्त बेल मारा . मी तुम्हाला पेपर वाचून दाखविण . फोन लावून देयीन .चहा करून देयीन . डबा तर तुमचा येतोच .

आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले . थरथर बंद झाली . मग म्हणाल्या जा तुम्ही घरी , स्वयंपाक करा ग़रज लागेल तर बोलवेन .


पण अशा आजीआजोबांनी करायचे काय ?

अगं आई अगं आई



नकोच लिहू अशा रडव्या कविता
नकोच मांडूस स्त्रीत्वाच्या व्यथा
नकोच करूस स्त्रीत्वाचा बाऊ
नकोच अशी मागे मागे  राहु


अगं आई अगं आई
नकोच शोधू जग काय म्हणेल
नकोच शोधू मी काय करेन
नकोच मांडूस व्यर्थ चिंता
नकोस चिंतूस कशी जळेल चिता

अगं आई अगं आई
उठ अशी ,जशा उठल्या ज्वाला
लिहि असे, जे जगतील साऱ्या स्त्रिया
जग अशी , दुःखालाही वाटेल हेवा
रहा अशी , रोजच आनंदाचा ठेवा 

अगं आई अगं आई
बघ असे , सुंदर  निसर्गाचा कुंचला
पळ अशी ,कमीच पडावी हरणाची चपळता
खा अशी , रोजच सुखाचा मेवा
दिस अशी , अप्सराही करतील हेवा


Sunday, May 17, 2015

वनवास


लेखक : प्रकाश संत .
   अमलताश (सुप्रिया दीक्षित ) वाचून झाल्यानंतर ओढ लागली ते म्हणजे "वनवास " वाचण्याची . कारण अमलताश मध्येच "लंप्या" ची तोंडओळख झाली होती . मग त्याचे भावविश्व जाणण्याचा ध्यास लागला  आणि वनवास वाचू लागले .
 वनवास हा खरे तर कथासंग्रह,पण  कथांमध्ये विभागले नसते तर कांदबरी हि होवू शकली असती असे वाटते . तसं पाहायला गेले तर हे पुस्तक म्हणजे लहान मुलांसाठी लिहिले आहे असे वाटते पण तसे  नाही . हे पुस्तक कोणीही कोणत्याही वयात वाचू शकते . लहानपणी ते वेगळ्याच दृष्टीने वाचू शकले असते म्हणून ते अगोदर का मिळाले नाही असे वाटून राहिले . पण आताही वाचून मी माझे बालपण आठवून झाले ,पुन्हा त्यात रमावेसे वाटले आणि खरच मी मनापासून एन्जोय केले . ह्यात पोंगडावस्था चालू असताना मुलांच्या मनात काय भाव असतात ,ते किती निरागस असतात , छोटी मुलं किती निरागसतेने भरलेली असतात . त्यांच्या मनातले भाव अगदी सुंदर टिपले आहेत ह्यात . आई-बाबां पासून दूर म्हणजे आजोळी राहिल्यावर ,आई बाबांची आठवण येवून वाटणारी रुखरुख , छोट्या  भावंडाची  येणारी आठवण , आजी आजोबांचा फिरणारा मायेचा हाथ . उच्च शिक्षित आणि समंजस आजोबांची नातवाला शिकवण्याची धडपड  एकदम मस्त .
  ह्यातील कन्नड भाषेचा प्रभाव आणि त्यातून झालेली विनोद निर्मिती तर अगदी अफलातून आहे . मला अशी काही नावे इथे देण्याचा मोह होतोच आहे .
"जंब्या कट्टमोळ , कनबार्ग्या गंग्या , वंटमुरीकर देसायांचा बोका , टुकन्या , परग्या , हत्तनगडी आणि खूप सारी नावे ."
तसेच ह्यातील असणारी आकड्यांची मजा - उदाहरणार्थ -"दहा गुणिले दहा भागिले शंभर , एक्काहत्तर गोष्टी . एकतीस जाडजूड खिळे ,वट्टात तेरा , एकशे सत्तावीस प्रश्न , तेविशेलक्ष , एकोणीसशे साठ "--असे हे बेस्टच आकडे वापरले आहेत त्यातून होणारा विनोद अगदी अफलातून .
  मुलांना निसर्गाबद्दल असणारे प्रेम , खेळण्याची असणारी अनावर ओढ , विनाकारण असणारी भीती --ह्याचे वर्णन अगदी मस्त .
 मुलांना मुलींच्या बद्दल असणारे त्यावयातील वासनारहित आकर्षण . त्यासाठी वापरलेले "सुमीचे" पात्र एकदम मनाला भिडते .

सर्वात छान म्हणजे "आजी आजोबा "--दुधाच्या साई सारखे प्रेम काय असते ते अगदी जाणवते .
"वनवास" हे दिलेले नावहि अगदी सार्थक आहे . लहानपणी ज्या गोष्टींचा कंटाळा असतो ,नकोशा वाटतात,वनवास वाटतो त्याच गोष्टी मोठेपणी वाचताना तोच वनवास बरा होता आजच्या ह्या "धकाधकीचा,धावपळीच्या ,जगण्याचे हिशोब द्यावे लागणाऱ्या  " वनवासापेक्षा कितीतरी छान आहे असे वाटते .
 ह्यातल्या  लंप्या च्या भाव विश्वातल्या कितीतरी गोष्टी आपण अनुभवल्या आहेत आणि आपण त्याची आठवण काढतो हेच या पुस्तकाचे यश म्हणायला हवे .
शाळा ,आजोळ ,मित्र -मैत्रिणी , छोटी भावंडं अगदी जशीच्या तशी उभी राहतात .

 हे पुस्तक वाचले ,अंमळ उशीराच वाचले तरीही का वाचले हे शेअर करावेसे वाटते म्हणून -
"ओझं ,चक्र ,भेट ,मैत्री " ह्या कथा खूप आवडल्या .

"आदम ह्या कथेतील मजकूर खूप आवडला पण त्याचा आदम शी जोडलेला संबध फारसा काही आवडला नाही

" विजय तरवडे" यांनी  नंदिनी देसाई यांचा "अमलताश " ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू शेअर केला होता ,तो वाचून प्रकाश संताच्या ह्या लंप्या बद्दल मनात उस्तुकता चाळवली आणि मग राज जैन यांच्याकडून मी "वनवास " हे पुस्तक मागवले आणि सुंदर अनुभव गाठीशी जमा झाला . त्याबद्दल ह्या तिघांचेही आभार .


Sunday, May 3, 2015

बहर 2


आईच्या घरासमोरच एक वड आहे . लाल बुंद छोट्या छोट्या फळांनी तो मागे लगडला होता . पटकन जावून खाऊन टाकावी अशी ती फळे . डोळ्याचे पारणे फिटावे असे ते सौंदर्य . पण तेव्हा हे लिहायचे राहून गेले .
अजून एक , मी राहते त्या बिल्डींगच्या मागे रस्ता आहे आणि घरे . तिथल्या एका घरात समोर छोटीशी , अगदी पाच बाय एक एवढीच जागेत झाडे लावलीत . अगदी रस्त्यातच . पण एवढी छान रातराणी फुलली होती , रात्री मंद सुवास यायचा . आख्खं झाड कळ्यांनी लगडले होते . आता रोज खूप छान सुवास येणार म्हणून खूप खुशीत होते पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी आले आणि आख्खं झाडच तोडून टाकले होते आणि ती छोटीशी बाग बोडकी झाली . असा फुललेला बहर , तोडू कसा वाटला असेल त्या माणसांना . हळहळले माझे मन . माझे जावूदे . एवढे दिवस वाट पाहून स्वतःच्या फुलांना स्वतासकट मुळापासून तुटताना काय काय वाटले असेल त्या रातराणीला . माणसाचा स्वार्थी घाव कोठे पडेल काहीच सांगता येत नाही . निसर्ग असा बहर अगदी मनापासून उपभोगतो . माणसाला काहीच मनापासून उपभोगता येत नाही .
अजून एक चाफा गावाकडून येताना शेतात पहिला . निष्पर्ण झालेला चाफा फुलानी अक्षरशः लगडला होता . फुलांना फुलवण्यासाठी त्यांना पानांची गरज नव्हती , सृष्टीचे चक्र मानून पानगळ झेलतात पण फुलतात ,गंधित करतात आसमंत . कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात बदल नसतोच. … किती शिकण्यासारख आहे निसर्गाकडून .
अजून कोणती कोणती फुले फ़ुललित . बोगनवेली तर अक्षरश: उधळण करत आहेत रंगांची . पूर्वी नव्हत्या काही त्यांच्यात एवढे रंग . पण शेजारच्या झाडाबरोबर क्रॉस ब्रीडिंग करून त्यांना एवढे रंग आलेत … माणूस तर माणसामाणसात जातीपातीच्या तट्टाणे लावून बसलाय .
आंब्याचा फिकट पिवळा मोहर मोहरलाय , त्याचा सुगंध अहाहा . अशीच शेवगा , कडुलिंब फिकट पिवळ्या रंगाची .
मोगराही तुरकाटी होतो पण फुलतो ह्याच काळात . मदनबाण म्हणतात त्याला लोक … एवढा सुगंध .मदनबाण नाव सार्थ करतो .
गुलाबी रंगाची किती फुले फुलली आहेत . फिकट गुलाबी रंगापासून गडद गुलालासारखे रंग आहेत .पण नावे काही माहित नाहीत त्यांची . लहानपणी काळा भोवरा खेळायचा तो तेवढा ओळखता आला . फिकट गुलाबी फुले आणि निष्पर्ण झाड . असेच भोवरया सारखे अजून एक झाड ,त्याला नारंगी फ़ुले. काही झाडांना अशी गुलाबी फुले आहेत ज्यांच्या पाकळ्या केसासारख्या आहेत . मधेच पिवळा आणि कडेने गुलाबी केसासारख्या रेषा .
अगदी डार्क पिवळी फुले जिच्या कळ्या आम्ही काढून टच टच वाजवत होतो पण नाव नाही माहित . अगदी बिट्ट्या पण पिवळ्या फुलांनी लागडलयात .
फिकट जांभळ्या रंगाची पण फुले गुलमोहरासारख्या झाडाला आलीत . गुलमोहराचा बहर तर काय वर्णावा . आख्खे झाडच केशरी.
अगदी आपला लाडका क्रिसमस ट्री ही खास राणी रंगाच्या उलट्या लोंबनाऱ्या फुलांनी लगडलाय .

अजून परवा काकीच्या माहेरी गेले होते तेव्हा मिरीचे झाड पहिले . काळ्या मिऱ्या झाडाला एवढ्या सुंदर दिसतात . आदि त्यांचे हिरवे घड लागतात , नंतर पिकताना मिरचीच्या लाल कलरचे घड होतात. एवढे सुंदर दिसतात . मस्त .
एवढ्यावरून -- निसर्ग बहरलाय हो…. एवढ्या उन्हाच्या झळा सोसून , निष्पर्ण होवूनही फुलांचे देखणेपण मिरवतोय . गळलेल्या पानांची ना खंत करतोय ना उन्हाच्या झळा लागतात म्हणून कुरकुर करतोय . तर अशीच बहर आपल्याही आयुष्यात येवुदे .