Monday, February 23, 2015

सोनुस पत्र

प्रिय सोनुस ,
    सोनू मी तुला जन्म दिलाय तो माझा आनंद म्हणून . माझ्या आनंदाच्या अनुभूतीचे तू प्रतिक आहेस .मला माहित आहे ,मला नाही जमले इतर आयांसारखे तुझ्यावर प्रेम करायला ,नाही जमले मला कौतुकाचे घास भरवायला आणि नाहीच जमले मला तुझ्यावर अभ्यास लादून तो तुझ्याकडून करवून घ्यायला . मी निश्चिंत होते तुला शाळेवर सोपवून ,तुझ्या शिक्षंका वर सोपवून .ते जे शिकवतील ते तू आनंदाने शिकशील आणि जे शिकशील ते फक्त तुझ्याच कुवतीचे असेल. माझी कुवत नाही लादत गेले मी तुझ्यावर , नाही मिसळली ती माझी कुवत तुझ्यात जबरदस्तीने .चुकले का  ग माझे ? तुझे अवकाश फक्त तुझेच असावे असे मला वाटत होते .ज्या कामात माझी खरोखरच गरज होती त्याच कामात तुला मदत करत राहिले . तुला अवघड वाटणाऱ्या म्याथस ,सायन्स च्या कोंसेप्त फक्त शिकवत गेले .माझ्या आई -बापाने बाराखडी -पाढे या शिवाय मला काहीच नाही शिकवले ,जे शिकवले ते माझ्या शिक्षकांनीच .पण मी माझ्या परीने शिकत गेले .म्हणूनच तुझ्या शैक्षणिक घोडदौडीत लुडबुड नको असे मला वाटत असते .मग मी या मुक्तांगणात सहजच सोडले . शाळेवर पूर्ण विश्वास ठेवून . क्लास ,ट्युशन मध्ये नुसते लिहूनच घेतात ह्या तुझ्या प्रतिक्रियेवर विश्वास ठेवून नंतर मी तुला क्लास ला जा असे कधीच बोलले नाही .तू रोज आपापल्या परीने करत आहेस . तुला पाठांतर नाही करता येत ,करत नाहीस ह्यावरही मी विश्वास ठेवला .तुझ्या चित्रकलेच्या प्रांगणात मी तुला तुझे चित्रांगण फुलवण्याची पूर्ण मुभा दिली .

   जमेल तशी ,लेख वाचून,माहिती मिळवून मी तुला सोप्या भाषेत पौगडावस्थेचि माहिती तुला समजावत गेले ,समाजावतेय . काय वाईट ,काय चुकीचे .स्पर्श ,लाज ,प्रेम यातले संबध आणि ज्ञान देत गेले ,देतेय . कपडेलत्ते ,शूज ,चपला ,सौदर्य प्रसाधने , मुलगी म्हणून जी काही हौस असते ती पूर्ण करत गेले ,करतेय . मैदानी खेळ खेळण्यास तुला आग्रह करत गेले .खेळण्यासाठी वेळ काढण्या साठी आग्रह करत आहे . मैत्रिणी मिळवणे ,त्या राखणे ,त्यांच्याबरोबर जमवून घ्यायला शिकवत गेले .

कधीतरी एखादा पदार्थ करण्याचा प्रयत्न कर असे सांगून -डाळ भात लावणे ,म्यागी बनवणे ,चहा बनवणे ,शेवटची चपाती लाटणे ,ओम्लेट बनवणे शिकवत गेले .कढी तशी जमली नाही पण काही हरकत नाही ..

पूर्वी मी मारत असे पण नंतर चूक समजून आल्यावर ते सर्व बंद करून तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे . अगदी मोकळेपणाने माझ्या आयुष्यावर बोलत गेले .त्याचाच परिणाम म्हणून तू खूपच छोटी असतानाच प्रौढ झालीस याचे मला नेहमीच वाईट वाटते . तुझ्या हट्टीपणाला माझा कधीच न पूर्ण झालेला हट्ट ह्या दृष्टीने पाहत गेले .

मी नाही देवू शकले तुला जास्त वेळ ह्या काळजीने मनात कुडते .पण तरीही तुझी लहानपणात स्वावलंबनाची वाटचाल पाहून सुखावत गेले .तुझ्या वागण्यावर विश्वास ठेवत इतरांकडे कोनाडोळा करतेय मी . भाजी आणणे ,अगदी लहान असल्यापासून स्वतच अंघोळ करणे ,खिडक्या पुसणे ,छोटे छोटे सामान आणणे ,कपड्यांच्या घड्या घालणे ,कधीतरी घरासफाईत मदत करणे ,ताट वाढून घेणे ह्या गोष्टी शिकवत गेले आणि तुला हे सर्व करताना पाहून सुखावत गेले .तुझ्या आवडीवर ,आवडीने केलेल्या पसाऱ्यात मोरपिसारा फुलवत गेले .वाईट वाटते ग मला त्या पसाऱ्याचे ,इतस्तत पडलेल्या सामानाचे पण उद्याची सोनू यातूनच फुलणार आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून खुश होत गेले .

   लोक मला तुझ्या आभ्यासाबद्दल विचारतात तेव्हा तुझ्या अभ्यासाच्या प्रगती पेक्षा इतर चांगल्या गुणाचे कौतुक करते पण तुझी अभ्यासातली खरी प्रगतीही सांगत गेले .पूर्वी नव्हती तुला आवडत मी जास्त पुस्तके वाचलेली,पण आजकाल तू हि इंग्लिश का होईना पण पुस्तके घेत आहेस ,वाचत आहेस ..हेच कमी नाही माझ्यासाठी .तू वाढदिवसाला ड्रेस आणि पार्टी ऐवजी बुक्स मगितलिस तेव्हा स्वर्ग दोनच बोटे उरला होता मला .

तुझी चित्रकलेची बक्षिसं पाहून मी खूप सुखावले पण तरीही वाईट वाटलेच मला तुझे मराठी कविता पाठांतर च्या स्पर्धेत सिलेक्शन नाही झाले तेव्हा कारण तेव्हा तू नवीन कविता मागितली होतीस माझ्या फेबु मित्र मैत्रींनिकडून  . कविता मोकाशी कडून  घेवून जेव्हा मी ती तुला दिली तेव्हा --"चांदण्या कुजबुजल्या " असे सारखे म्हणत गोड हास्य देत होतीस मला आणि तिला 'थान्क्स' म्हण ग अशी धमकीच दिली होतीस तू मला आणि तरीही विसरलेच होते मी तिला थान्क्स म्हणायला .पण आज या पत्राच्या निमित्ताने सांगते ग तिला थान्क्स म्हणून .

माझ्या आवडत्या जुन्या गाण्यांना जेव्हा तू गुणगुणतेस तेव्हा मला मिळतो एक सुखद गारवा .सुखावते मी जेव्हा तू माझे अश्रू पुसतेस आणि म्हणतेस -आय डोंट लाईक माय रोत्ल्लू ममा "


    पण तरीही रुततो मला तुझा आगवूपणाचा एखादा शब्द ,तरीही खुपते मला तुझी अभ्यासातली प्रगती .तरीही रुततोच मला तुझा कधीकधी केलेला वेड हट्ट ,तू अन्द्रोइद मोबाईल चा केलेला हट्ट .रुततेच मला तुझे म्याथ्ला तिरस्कार करणे ,माझ्या वेडेपणावर हसणे ,अस्ताव्यस्त होणे ,पसारा करणे .पण दाबून ठेवते मी सर्व -फक्त तुझ्याचसाठी .

Friday, February 20, 2015

आठवणीतले रामा सर

       जन्म आणि मृत्यू ह्या माणसाच्या आयुष्यातील दोन अटळ घटना , ह्या दोन घटनांशिवाय माणसाचे हे आयुष्य पूर्णच होत नसते . जन्माने पूर्णतः अस्तित्वात नसलेली व्यक्ती जन्माला येते तर मृत्यूने ती व्यक्ती ह्या जगातून नाहीशी होते . नाहीशी म्हणजे किती तर इतरांनी कितीही टाहो फोडला , कितीही पैसे मोजले तरी तो माणूस परत आपल्याला दिसू शकत नाही . फक्त आणि फक्त आठवणीच जागवता येतात .  विज्ञान कितीही पुढे गेले तरी ह्यावर काहीही उपाय नाही . पण माणूस अक्षरशा गुलाम झालाय ह्या नोकरी धंद्याचा . कोणाला भेटायला जायचे असते , कोण्या आजारी माणसाला पाहायला जायचे असते पण आपण ते पुढे ढकलत असतो , उद्या जावू , परवा जावू -- अशी हि यादी संपतच नाही आणि अचानक ती व्यक्ती निघून जाते . आपण जाण्याने फार काही फरक पडणार नसतो पण त्या व्यक्तीच्या शेवटच्या काळात त्याला थोडेतरी सुख मिळते , त्याचे   /तिचे   मन थोडे का होईना फुलपंखी होत असेल . जाण्याचा तो काळ थोडातरी सुखाचा होत असेल पण असे होत नाही . आजचा माणूस परिस्थितीचा , नोकरी धंद्याचा अक्षरश : गुलाम झालाय .

    हे आठवण्याचे कारण आज आमच्या शाळेचे रामा जोशी सर गेले , त्यांच्या शेवटच्या काळात ते इथे पुण्यातच होते पण भेटायला जायला जमलेच नाही न त्यांच्या अंत्यविधीला . पण अजूनही त्यांची शाळेत जातानांची छबी डोळ्यासमोर आहे . दहावीचे फार तर दोन चार क्लास त्यांनी आम्हाला शिकवले पण त्यांची ती शिकवतानाची मूर्ती अजूनही डोळ्यासमोर आहे  त्यांच्या घरी दत्त मंदिरआहे . तल्लीनतेने  दत्ताची पूजा करतानाचा त्यांचा वावर जसाच्या तसा डोळ्यासमोर आहे . सकाळच्या काकड आरतीला त्यांनी हातात घेतलेली पंचारती अजूनही तशीच दिसतीय . दत्ताच्या पालखीला सोवळे नेसून उपरणे सावरतानाचा - "दत्ता दिगंबरा यावो , स्वामी मला भेट द्याहो … " हा आवाज अजूनही घुमतोय . लग्नाच्या साखरपुड्याला त्यांनी केलेली कलश पूजा . सासरच्या नवीन मंडळीत घाबरून जावू नये म्हणून ते मला देत असलेला धीर . जसेच्या तसे सर्व आठवतेय . सरांची तीच मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे . त्यांचा मुलगा श्रीकांत माझा  क्लासमेट  , परवाच भेटलो तेंव्हा सरांच्या बद्दल बोलणे झाले … पण तरीही भेटण्यासाठी वेळ काढतच आला नाही ह्याचे शल्य आहेच .  डोळे दान करून एक आदर्श शिराळकरांसाठी त्यांनी घालून दिला . सर्वांची आपुलकीने चौकशी करणारे सर गेले म्हणून अक्खा गाव आज हळहळला . त्यांना शेवटी भेटू नाही शकलो म्हणून प्रत्येक शिराळकर मनाने हळहळला . कोठेही घेवून जावू नकोस असे मुलाला सांगून त्यांनी स्वप्रतीमेचे अवडंबर हि माजवले नाही . किती ते आदर्श आणि सचोटीचे वागणे . "मुलांना फुलाने मारावे", असे ते एकदा आज्जीला म्हणाले होते ते  वाक्य आठवले … त्यांना माझ्यातर्फे  भावपूर्ण श्रद्धांजली .

 दररोज मी आईकडे फोन करून आजोबांची तब्बेत विचारायचे , आई सांगायची तब्बेत बरी आहे अण्णांची पण तू येवून भेटून जा . आठवण काढतात तुझी . हो ग येते - सुट्टी कधी मिळतेय बघते.  असे सांगते तोवर मुलीची परीक्षा होवूदे , पुढे प्रोजेक्टचा रिलीज जवळ येतो . तोवर कंपनीची ट्रिप निघते , तोवर अजून कोणता तरी प्रोग्रॅम ….  असे होत राहिले आणि अण्णा एक दिवस असेच अचानक निघून गेले . गावी पोह्चोपर्यंत आण्णांचा अंत्यविधी होवूनही गेला होता त्यामुळे मनात एक कायमची हुळहूळ लागून राहिली पण तरीही मला ते आठवतात ते बरे असतानाचे . चालणारे फिरणारे . कधी कधी वाटते बरेच झाले आपण त्यांचे पार्थिव नाही पहिले नाहीतर तोच शेवटचा क्षण आठवत राहिला असता . त्यांना असे अंथरुणात झोपवलेले निर्जीव शरीर आठवले असते पण आता आठवतात ते - झाडाला पाणी घालातानाचे अण्णा . पांढरे शुभ्र  धोतर नेसून त्यावर शर्ट घालून बाहेर पडण्यासाठी तयार झालेले अण्णा . चहा पितानाचे अण्णा . कोणाशीतरी बोलतानाचे अण्णा . आताही कोणी टोपीवाला मी मागून  पाहिला कि माझ्या नकळत डोळ्यात पाणी तरळते . डोळ्यांच्या कडा ओलावतात . पण अजूनही आपल्या आजूबाजूला ते आहेत असे वाटत राहते .

कितीहि काही केले तरी ह्या माणसांची हानी भरून निघत नसते , कितीही मनावर ओरखडे उठले तरी ह्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात रुंजी घालतात पण तरीही एक दिवस हे जग सोडून जायचे असते , हाच असतो प्रवास म्हणून मी मनाला समजावले …

Thursday, February 19, 2015

मामाचा गाव आणि सुट्टी

  
सुट्टया पडल्या कि आजकाल मुलांना किती प्रश्न पडतो ,कोठे जायचे ? कसे काढायचे एवढे दिवस ? रोज रोज तेच तेच काय'बोर प्रोग्राम पाहणार ? कोणच्या परीक्षा -- नवीन ट्युशन , खेळायला मुली पण नाहीत . कोठे करायचे सायकलिंग ? हे भरधाव धावणाऱ्या गाड्या . मुख्य म्हणजे खेळण्यासाठी मित्र -मैत्रिणी नाहीत आणि दुसरे म्हणजे खेळायला जागा हि नाही . मला पूर्वीचे दिवस आठवले . आज शाळेला सुट्टी मिळाली कि उद्या मामाच्या गावी जायचे .  आजोबा न्यायला येत असत . मग दोन-तीन फ्रोक वायरच्या पिशवीत भरायचे आणि सकाळी सकाळी निघायचे . आई चपाती -पिठलं करून द्यायची . गावात पोहोचतो न पोहोचतो तोच आजोबा म्हशी घेवून पाण्यावर जायचे नदीला . मग लगेच त्यांच्याबरोबर नदीवर . नदीत मनसोक्त खेळायचे ,डुंबायाचे . घरी परतून गेले कि आजीने मस्त स्वयंपाक केलेला असायचा . त्यावर ताव मारून रात्री स्लापवर झोपायला जायचे .तिथे चांदण्या मोजत ,रामचा पाळणा आणि काय काय शोधायचे आकाशात . आईची आठवण काढत ,तुटते तारे पाहत झोपून जायचे .
          सकाळी चहा-बटर खावून पुन्हा नदीवर .    घरी येयीपर्यंत आजीने ताक -सांडगा भाकरी तयार ठेवलेली असे . खावून मग मोर्च्या वळायचा तो सर्वांच्या घरात . प्रत्येकाच्या घरात मायेचा हात डोक्यावरून फिरत असे . "कवा आलीस ?कशी हायीस बाळे , शेशा बरी हाय नव्हं " असे विचारले जाई . मग सर्व पाहुणे मंडळी  म्हणजे बच्चे कंपनीचा मोर्चा मोठ्या महादेवाच्या मंदिरात . तिथे मग काय काय खेळायचो बापरे . पुन्हा बारापर्यंत जेवायला घरी . जेवून मग पत्त्यांचा डाव .त्यात मेंडीकोट ,गुलाम ,पाच तीन दोन , साथ -आठ खेळत असू . काय काय छक्के -पंजे तिथे लडवत असू बापरे . दुपारी करवंद ,जांबळ विकणाऱ्या बायका यायच्या . त्यांच्याकडून मग आजी भातावर किवा मक्यावर घेत असे . प्रत्येकाचे वाटे आजी काढून देई . करवंदातले मग कोबडा -कोबडी शोधायचे .  मग चार वाजता आजी आंब्याचा हारा घेवून बसे . प्रत्येकाला ऐक ऐक आंबा आजी वाटून देई . एक खावून पुन्हा दुसरा मागायचा. आजी देई . कधी कधी रागे हि भरत असे .
        रोज काहीतरी नवीन पदार्थ . अमृतफळ ,मेतुंडा आणि काय काय . आठवड्यातून दोनदा मटन ,रक्ती ,मुंडी (बकर्याची ), मासे ,खेकडे . खूप चव होती आजीच्या हाताला . दुध दुपतेहि कमी नसायचे .तुप तर आजी पुरे म्हनोपर्यंत वाढायची . कधितरि शेतात म्हजे "आंबील काट्यात"(शेताचे नाव ) जाण्याचा प्रोग्राम . पाटीतन  आजी सर्व जेवण बांधून घेई . पाटी आणि आम्ही tractor मध्ये चढवले जावू . म्हजे ट्रॉलीत . मग मस्त दणके खात खडाम खडाम आवाज करत शेतात .तिथेहि नदी . वांब पकडण्यासाठी आजोबांनी निगडीचे झुपके नदीत झुडपात अडकवलेले असत. मग शेतात पोहचल्यावर त्या वाम्बा पकडण्याची प्राक्टीस . नदीत पोहत नदी पार करण्यची स्पर्धा .  उन्ह लागायला लागले कि केळीची पाने काढली जायची . भात आणि दही ,भाकरी ,चटणी ,भाजी -उसळ . भात आणि दह्यात आजी नदीचे थोडे पाणी आणून कालवी मग तो सरबरीत होई . केळीच्या पानावर खाताना मजाच येई . खावून मग पुन्हा नदीत . संध्याकाळी पुन्हा उसाची पाचट काढलेलं भारे , माक्यचा भारा असे सर्व ट्रक्टर मध्ये भरले जाई . त्या भाऱ्यांवर बसून पुन्हा घरी . आता थोडे दणके कमी बसत .
         भल्या मोठ्या गणपतीचे मंदिर , बापू मामाच्या दुकानातल्या फुकण्या (बॉबी ), पारावरचा मारुती . विठ्ठल रखुमाई च्या मंदिरातली भजने . महादेवाच्या मंदिरातला भला मोठा नंदी,त्याची गहूभर पुढे सरकण्याची कथा . १०८ पिंडी, मंदिरात चढून नाण्यासाठी असणऱ्या दहा पायऱ्या . संपूर्ण दगडी मंदिर ,आणि खूप साऱ्या दगडांच्या मुर्त्या. उंचच उंच गोपूर . हेमाडपंथी मंदिर आहे बहुदा .     कधीच विसरणार नाही हे मी .

 कधी मह्याची टेकडी . तिथला भैरोबाचे दर्शन. मग मामाच्या मुलींकडून -इथे ह्याचे शुटींग झाले , त्याचे झाले ह्याचे किस्से . मजा मजा नुसती . कोल्हापुरी भाग आणि नुसता ऊस त्यामुळे हिरवेगार दिसे सर्व अगदी उन्हाळ्यातही . हळूहळू भाषा उतरायची गळ्यात आणि मग आपोआपच हेल काढला जाई . "काय करतासा ssss ,बर हायचा नव्ह sss " . कधीतरी कोल्हापूरची अंबाबाई ,ज्योतिबा करून यायचे .  सर्वात मुख्य म्हणजे लग्न सराई असल्यामुळे पाह्यला मिळणाऱ्या वराती . लेझीम चे खेळ . अहाहा अप्रतिम . स्वताला नाचायचा मोह व्हायचा पण मुलीना नाचायची पूर्ण बंदी . शेवटी सुट्टी संपत येत असे . अण्णा सोसायटीतून मोठा तागा आणायचे गुरवाच्या आबांकडे फ्रीलचेफ्रोक शिवले जायचे .  हळूहळू परतीचे वेद . हळूहळू पावसाला लागे आणि मामाचे गाव पुराने वेडले जायचे . मग नावेतून कोगे -बालिंगा आणि नंतर कोल्हापूर असे परतीचा प्रवास . जड मनाने परत गावी पुढच्या सुट्टीत येण्याचे आश्वासन देवून . अजून खूप आहे आठवणीच्या कुपीत. तपशिलाने पुस्तक लिहून होईल . पण कोल्हापूर भागातली माणसे जरी "टगे "म्हणत असलो तरी तशी नाहीत . माया मामाताही खूप आहे त्यांच्याकडे .

Wednesday, February 18, 2015

बागेतले आवाज

बागेतले आवाज
   रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सोनूचा डबा ,तिला शाळेत घालवून सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते . तिथे उभे असणारे हसण्याचे नाटक करत असतात पण बाहेर चालणाऱ्याना त्यांच्या कडून पाहून खूप हसू येते त्यांचे ते कृत्रिम हसे पाहून बाकीचे बाहेरचे खूप हसत असतात . त्यांच्या हसण्याचा आवाज येत राहतो .
परवा एक छोटी आपल्या आजोबांबरोबर आलेली होती . आजोबा तिला थोड्या पुढे असणाऱ्या मुलांच्या खेळाच्या जागेकडे नेवु पाहत होती तर ती हट्टुण पुढे पाय उचलत नव्हती . आजोबा म्हणत होते , "झोपाळ्यावर नाही बसायचे तुला बाळ ?"  ती," मला हसायला जायचे आहे". मज्जाच वाटली तिचे हे उत्तर ऐकून . आजोबांचे वय लहान होवू पाहत होते आणि तिला मोठे होण्याची घाई लागली होती
इथून पुढे खऱ्या अर्थाने चालणाऱ्याच्या पायाचे "झपझप " आवाज ऐकू येवू लागतो कारण हा रस्ता उताराचा आहे . . शूज घालून चालणाऱ्या पेक्षा धावणाऱ्या माणसांच्या शूज चा खूप आवाज येत असतो . आता बाग वळण घेते . त्या कोपऱ्यावर बच्चे कंपनीची जागा आहे . तिथे सी सा , घसरगुंडी , झोपाळे आणि बरीच खेळणी आहेत . मग झोके फिरतानाचा "करकर "आवाज येत असतो आणि त्या बरोबर कोणी मजेने हसत असतो तर कोणी घाबरून "स्सस " असा आवाज काढत असतो . कोणी आनंदाने ओरडत असतो . कोणी छोटी मुलं जबरदस्तीने झुल्यावर बसवली कि हे "भोकाड " पसरून, शिरा ताणून  रडत असतात . सी सा वर मुलं खेळत असली कि जोरात एक बाजू टायर वर आपटून "फट फट " असा आवाज येत असतो . घसरगुंड्या -त्यावर पण एक "सुस्स्स " असा आवाज येतो अ. आणि त्या नळयासारख्या घसरगुंडीवरून कोणी आले की त्या नळ्या वाजतात त्याचाही एक आवाज येतो . तो हि आवाज मला शब्दात पकडता आला नाही . पण तो गडगड आवाज म्हणता येयील .
    तिथून पुढे बागेच्या रस्त्याला चढ लागतो , आणि बागेत हिरवळीवर टाळ्या वाजवत बसलेले बरेच असतात . कोणी प्राणायाम करत असतो . त्यांचा नाकाने जोरजोरात श्वास सोडणे चालू असते . फूस फूस असा आवाज त्याचा येत असतो . तिथून पुढे काही जणांनी ओमकारचा नाद लावलेला असतो .
 रस्त्यावर चालणारे आता चढाला चालत असतात . मग दमून ते सॉय सॉय आवाज काढत असतात . मधून त्यांचा चपलांचा घासाल्याचा आवाज येत असतो . काहींचा वेग मंदावतो मग संन्त आवाज येत राहतो .
 तिथून पुढे एक ओहळ आहे . तिथे एक बाकडे आहे . तिथे त्यावर एखादे जोडपे बसलेले असते . इतक्या हळू आवाजात ते कुजबुजत असतात आणि आपल्याच धुंदीत मग्न असतात . घरात काही बोलायला मिळत नसेल म्हणून इथे येवून त्यांची लाडिक गुफ्तगू चालत असेल .
पुढे पुढे एक धबधबा येतो . त्याचा धबधब आवाज येत असतो . त्यात बरेच कावळे भिजून पंख फडफडवत असतात , त्यांच्या पंखाचा फडफडण्याचा आवाज येत असतो . मधेच काव काव करत असतात . धबधब्याशेजारी बच्चे कंपनी खूप असतात . त्यांचा त्यात उतरण्याचा प्रयत्न असतो . मग मजेत भिजत खळाळणारे पाणी अडवतात आणि फुर्र करून सोडून देतात . तेच पाणी पुढे छोट्या तलावात साठवलेय , तिथेही  ही बच्चे कंपनी पण थोडी मोठी (१२ -१३ वर्षाची ) छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यात हे पाणी भरून पुन्हा खाली सोडतात . त्याचा टप टप आवाज येत राहतो आणि पाण्यावर तरंग उमटतात . मध्येच बाहेरून जाणाऱ्या एखाद्या बसचा आवाज येतो , एखद्या स्कूटरचा . धबधब्याच्या थोडे पुढे म्हाताऱ्या बायकांचा एक अड्डा बसलेला असतो ,अगदी कासटा घातलेल्या ह्या आज्ज्या यायाम , सुना , नातवंडे , पोरं , दुखणी भानी ,डाकदर ह्यावर मनसोक्त गप्पा मारत असतात . जवळच खेळणाऱ्या नातवंडावर लक्ष ठेवून असतात . तिथेच जवळ काही दोरीवर उड्या मारणारे असतात . त्याचाही एक वेगळाच आवाज येत असतो . काही सुगावत्या सूर्याकडे पाहून मंत्र पुटपुटत असतात . मधेच चिमणी चिवचिवत असते . अगदी छोटी चिमणीसारखी दिसणारी चीरचीरत असते . मधुनच कोकीळ कुहूकुहू करत असते .  मधेच बसायला असणाऱ्या छपराखाली काही हास्य क्लब वाले हाहू हेहे करत उड्या मारत असतात . अजून खूप सारे पक्षांचे आवाज येतात पण ते मला शब्दात बसवताच येत नाहीत .

आता बागेचा राउंड संपतो . बाहेर आल्यावर नारळ वाला खापखाप नारळ फोडून पाणी देत असतो , त्यांचे रेट सांगत असतो. मध्येच एखाद्या लहान मुलाने नारळ मागितलेला असतो. आई बाबा नको म्हणत असतात . मग त्याचे भोकाड पसरलेले असते . पुढे कसले कसले रस विकणारा असतो. तो बाटल्यातून रस ग्लासात ओतत असतो . तो ओतन्याचाही एक आवाज असतोच. 

तुळशी वाणी जलम गेला

भराभर गवारीच्या शेंगा मोडत होते . ऑफिसला आज उशीर करायचाच नाही  ह्या बेतानेच माझे हात चालत होते . एक एक काम आठवत नजर घड्याळाकडे होती , इतक्यात फोन वाजला . सकाळी सकाळी नकोच घ्यायला . ह्या ऑफिस वाल्यांना दमच नसतो ,म्हणून दुर्लक्ष केले तर  परत खणखणला . आता घेण्याशिवाय पर्यायच नव्हता . फोन ऑफिसचा नव्हता आणि घेतलाच 
 फोन घेतला आणि एकदम सुन्न झाले . सर्व तसंच ठेवून साडी नेंसायला घेतली . आता साडी नेसून जाणं अपरिहार्य होतं . वैताग नुसता . गाडीवर जाणे ते ही साडी नेसून मग अजून वैताग . नऊ -दहाचे उन्ह. "अधिक सुंदर, अधिक सुखी , अधिक समृद्ध", असे मोठ मोठे बोर्ड डोक्यात जायला लागले .
हळूहळू सुन्न मन विचार करायला लागले .
 ताराताई , इनमिन खच्चून  १५- २० किलोच काय असेल ते अस्तित्व . बाकी एक लुगड आणि चोळी . वय असेल ८५ च्या आसपास , ते हि अंदाजाने मांडलेले .  चिंचेच्या झाडाखाली एक खाट आणि त्यावर एक रग . एक वाकळ . एवढेच . तरी जीव जायला दोन तीन दिवस गेले ,  काय राहिल्या असतील का अपेक्षा ?
काय राहिल्या असतील का इच्छा ? काय राहिल्या असे म्हणण्यापेक्षा कोणत्या पूर्ण झाल्या ह्याचाच विचार जास्त करायला लागले .
 १२- १३ वर्षाची असताना ताराताय चे लग्न झाले ते ही तेवढ्याच वयाची तीन चार पोरं असणाऱ्या विधुराशी . सावळाच वर्ण , धारदार नाक , उंचीपुरी ताराताय . तारुण्यात नक्कीच मदनाची अप्सरा असेल. बंडखोर पण तितकीच . भावांना भावजायाना जशी बोलायची त्यावरून ती बंडखोर असणार हे नक्कीच . का दिली असेल तिच्या वडिलानी तिला आपल्याच वयाच्या माणसाला ?
    लग्न करून नवरा मिलेटरीत दिल्लीला निघून गेला . पदर पण आला नव्हता तेंव्हा तिला . चार पोरांना खायला करून घालायला आणून ठेवली घरात आणि निघून गेला . आणि दोन वर्षात टी बी ने खंगून परत आला . सेवा केली दोन चार वर्षे  जाग्यावर आणि मेला . पोरं कामधंद्या साठी हीला हाकलून मुंबईला निघून गेली . आली परत माहेरात . तुझाही तिथे अधिकार आहे, किमान भाकरी तुकडा तरी मिळवून खा हाय त्या जमिनीत असेही बाप म्हणाला नाही आणि पाठचे चार भावूही म्हणाले नाहीत .
 झाले ताराताय आता इथंच राहणार हे पक्क. १२ पोरं झालेली म्हातारी अधिकच कृश मग म्हातारीला बसून काम नाही होत तर तीच करी सर्व . पुढे मागे भावाचे लग्न झाले आणि ताराताय भावजयीवर तोंड टाकायची . दुसरी आली , तिसरी आणि सर्व आल्यावर तायला कोण टुकडा पण दिना . शेवटी ताय आणि म्हातारी दोघीच राहू लागल्या . शेजार पाजार कडून आमटी मागून आण , बाहेर असलेल्या पोरांकडून मिळालेल्या पैशात चहा पावडर आणणे .काळा चहा पिणे असे सर्व चालू होते . म्हातारी गेल्यावर तायची परिस्थिती अधिकच बिकट झाली , गप कोपऱ्यात बसून काही तुकडा मिळतोय का बघायची ताय , ते ही डोळे पिंजारून . अजून बंडखोर होतीच ती , कधीतरी तिच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दातून कळत असे पण कोणी काही बोलतही नसे आणि कोण विचारतही नसे . मग मुग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय च नव्हता तिला .
    एक एक भावाचे लग्न झाले , काय झाले असेल त्यांचा शृंगार फुलताना पाहून ? काय माझं नशीब म्हणून रडली असेल का मनाने ? शरीराने कामेच्छ्याच्या ज्वाला फेकल्या असतील तेव्हा काय केले असेल ? किती मन मारले असेल ? का असला काही विचारच आला नसेल तिच्यात ?
भावाच्या पोरांची लग्ने चालू झाली तेंव्हाच नवीन लुगडे मिळायला लागले . नाहीतर दंड घातलेली लुगडीच तिची साथ देत होती . जग काय म्हणेल ह्या एवढ्या एका विचारावरच तिला घरात जागा होती आणि झोपायला एक कोपरा .
 मी गेले कि ताय ला एक नोट मिळे मग ती कितीची असुदे १०० ची किंवा पाचशेची . ताय काहीच बोलत नसे . कडाकड बोटे मोडी माझ्या तोंडावर हात फिरवून . माझी ज्योती तेवढी मायेची म्हणे . तुला नोट मिळते म्हणून तुझा तिच्यावर जीव आहे असे तिला सारे चिडवत . पण तिचा आवाज वाढला की बाकी सारे शांत . म्हणजे ती बंडखोर होतीच पण मग ह्या आख्ख्या तारुण्यासाठी ती का बंडखोर झाली नसेल ?
शेवटी तिला डोळ्याने दिसायचे कमी  झाले .  कोणी खायला घालीना तरीही सरावाने गावातनं परड्यात आणि तिथून माघारी असे करत असे . कोणीच थारा देत नसे  मग चिंचेच्या झाडाखाली खाट मांडून एवढ्या थंडीत ती झोपत असे . चिंचेनेच तिला सहारा दिला .

 मेल्यावर तिला तुकडाही  न घालणाऱ्या भावजया गळा काढून रडत होत्या , माझ्या हाताचा चहा घेतला ग , माझ्या हातच चहा पिला गंsss . मीही तुझी सारखी आठवण काढते असा फोन येवूनही भेटायला गेले नाही . का गेले नाही ते कोणास ठावूक पण गेले नव्हते हेच खरे . गेल्यावर ताराताय बोलत नव्हती . पिंजारल्या डोळ्याने माझ्याकडे बघत नव्हती का नोट मिळेल ह्या आशेने माझ्याकडे पाहत नव्हती
मी आलेय ग भेटायला असे म्हणून ओरडून मन सांगत होते पण ताराताय माझ्या पैशाकडे पाहत नव्हती .आया बाया  शेवटची अंघोळ घालण्यासाठी केस विंचारात होत्या , हेच हाथ पूर्वी कधी तिच्या डोक्यावरून फिरले का नाहीत ? माहेरची नवी साडी घातली होती ,हीच नवीन साडी पूर्वी का तिला मिळाली नाही ? तिचा राग राग करणाऱ्या भावजया आता का गळा काढून रडत होत्या ?
"तुळशी वाणी जलम गेला " हे तिला त्यावेळी मिळालेलं बिरुद तिला काय कामाचे होते ? ही हळहळ काय कामाची होती ?
सगळ्यात शिसारी आली ती , ती मेल्यावर तिच्या सावत्र पोरांना फोन केला गेला , या तिला जाळायला म्हणून . तुमची आई मेलिय म्हणून . तिच्या मरण्यावर पण तिचा सासरचा अधिकार होता .  तिच   कधी न  पाहिलेली नातू तिला जाळायला आले , शितोंडी धरायला आले . माहेरची पाहुणे म्हणून फक्त बरोबर गेली . काय हे जीवन ?
ताराताय ,"नेली तुला कृष्णामायच्या घाटावर " अशी शिव्या द्यायची , पण आज तीच स्वतः कृष्णा मायला भेटायला गेली कायमची .
तरीही एक प्रश्न आहेच , नियती इतकी क्रूर असू शकते ? आख्ख आयुष्य असं फक्त भाकरीच्या तुकड्याच्या आशेवर काढता येते ?जन्म दिला म्हणून बाप आपल्या मुलीचे संस्कार संस्कृतीच्या नावाने बलिदान देवू शकतो ?आपल्या आयुष्याची होळी होती  आहे असे पाहून पण कोणी फक्त आपल्या भावांची , घराण्याची किंमत राखण्यासाठी इतकी किंमत मोजू शकते ? का फक्त हि किंमत स्त्रियांनीच मोजायची असते ?