Monday, June 29, 2015

अमृता इमरोज : एक प्रेमकहाणी

अमृता इमरोज : एक प्रेमकहाणी
लेखिका : उमा त्रिलोक
अनुवाद : अनुराधा पुनर्वसू
खरे पाहता मी अमृता प्रीतम यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही किवा मला फार माहितीही नाही. फक्त ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे , अमृता प्रीतम एक भन्नाट ,निर्भीड आयुष्य जगल्या आणि इमरोज आणि त्यांचे प्रेम होते आणि अधून मधून फेसबुक वरील एखाद्या ग्रुपमधून चाललेल्या चर्चांमधून त्यांची माहिती मिळाली एवढेच .
पुस्तकजत्राच्या प्रदर्शनात हे पुस्तक मला दिसले आणि अंतरंगात पाहण्याची मला इच्छा झाली . वाचताना इमरोज चे अमृताजी वर किती प्रेम होते ते त्यातील त्यांच्या काही वाक्यामधून कळते . अमृताजी सुद्धा किती धाडसी असाव्यात ,एवढी इतक्या जुन्या काळी सुद्धा त्यांनी जे धाडस केले ते अफाट आहे . अमृताचे साहीर वर प्रेम असूनही ,भूतकाळ माहित असूनही ,कसलीही अपेक्षा न करता इमरोज त्यांच्या बरोबर राहिले म्हणजे त्यांचे किती निर्व्याज प्रेम होते ते दिसून येते .
नुसती कविता ऐकून घरात वेल लावणारे इमरोज ,चित्रकार इमरोज ,समंजस इमरोज अशी इमरोज ची बरीच वैशिष्टे समजतात पण त्यामानाने अमृताजींचे फार वैशिष्टे कळली नाहीत .
लेखिका त्यांना खूप उशिरा भेटल्यात म्हणूनच बहुतेक पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे खूप सारे अपेक्षित होते ते आले नाही . कसे भेटले ? पहिल्यांदा काय मनात आले , दोघांच्याही मनाच्या तळात जायला लेखिकेला जमले नाही असे मला वाटते .
बाकी दोघांचे एकमेकांवर अगदी निस्सीम प्रेम होते हेच फक्त कळते .
काही पंजाबी कविता जशाच्या तशा दिल्यात आणि नंतर अनुवाद हे थोडं बरे वाटले .

पण आता अमृता प्रीतम यांचे सर्व साहित्य नक्कीच वाचायला हवे ,अशी इच्छा निर्माण होते . एवढे काम हे पुस्तक नक्कीच करते . प्रेमकहाणी असूनही ह्या पुस्तकातून अश्लील , कोणत्याही गटाने वाचू नये असे काहीही आले नाही ,हे अतिशय चांगल्या पद्धतीने लेखिकेने साधले आहे .

ती


बोळक्यांचा संसार
मांडून अलवार
स्वप्नातला संसार
खेळीती ती


सुखाचा संसार
करण्या सुंदर
मायेचा आधार
सोडिते ती

सोडून माहेर
मनात काहूर
साज शृंगार
सजते ती

प्रीतीचे तुषार
मानून मधुर
भेटण्या आतुर
होतसे ती

गरम भाकर
करण्या तत्पर
हाताला चटके
सोसिते ती

प्रीतीचा पाझर
मायेचा निर्झर
प्रेमाची चादर
घालीते ती

सुखाचा सागर
करण्या सादर
दुःखाचे डोंगर
झेलीते ती

सोसून मार
दाबून प्रहार
कित्येक प्रहर
जागीते ती

वेदनेवर फुंकर
घालून हळुवार
वय म्हातारं
सोसिते ती
©ज्योती पवार

प्रारब्ध

प्रारब्ध
जन्म कोठे मृत्यू कोठे
नसते हातात काही
सुख छोटे दुःख मोठे
लिहिते सटवाई बाई

जात कोणती धर्म कोणता
ठरवते जन्माची आई
रूप कसले रंग कोणता
वांशिकता ठरवते सर्व काही
हीच शाळा तोच परिसर
ठरवतात बाप आई
काय शिकायचे कसे वागायचे
नसतेच हाती काही
स्वप्न कोणते ,दिशा कोणती
ठरवते गुणपत्रिका बाई
छंद कोणता उर्मी कोणती
दाबून घुसमट होई
प्रेम कोणते जोडीदार कोणता
निवडीचा हक्क आम्हा नाही
जात धर्म ,समाज भामटा
अन पत्रिका ठरवते सर्व काही
नोकरी कोणती धंदा कोणता
परिस्थिती ठरवते सर्व काही
लाथ मारून नशीब उजळता
अगदीच मोजके काही
जाळायचे कि पुरायचे
धर्म आडवा येई
उभ्या ह्या आयुष्याचे
बंध हाती नाही
असे हे प्रारब्ध
आयुष्य जाळीत जाई
©ज्योती पवार

गवत्या (मिलिंद बोकील )

गवत्या
मिलिंद बोकील
मौज प्रकाशन
गवत्या हा सह्याद्रीतला एक डोंगर .सोंडूर गावात हा डोंगर आहे . उगवणाऱ्या गवतावरून त्याचे गवत्या हे नाव . हा डोंगर जरी ह्या कथेचा नायक दाखवला असला तरी आनंद हा ह्या कथेचा खरा नायक आहे. तब्बल ४१० पानातून आनंद हा नायक आयुष्य निर्भेळ आनंदाने कसे जगायचे त्याहीपेक्षा आपण ते जगतच असतो हेच सांगत राहतो.
आनंदला आयुष्यात नक्की काय करायचे असते ते माहित नसते त्यामुळेच कोणतेही ध्येय न ठेवल्याने कोणत्याच गोष्टीत त्याचे मन रमत नसते . फक्त सरळमार्गी आयुष्य जगणे , नोकरी करणे ,त्यात मन नाही रमले की ती सोडून देणे असे उद्योग तो करत असतो. त्यामुळेच मुंबई सारख्या ठिकाणी राहून पण त्याचे मन ह्या गर्दीत रमत नसते . त्याच्यावर त्याच्या बालमैत्रीण अनुच्या प्रेमाचाही काही उपयोग होत नाही . अशा ह्या निराशेतून तो सोंडूर ह्या गावी गांधीच्या आदर्शानुसार चालणाऱ्या केंद्रात येतो .केंद्र चालवणारे घारपुरे , मुकणे , जी डी , शाळा , ब्रम्हे मास्तर . प्रत्येकाकडून त्याला काही नवीन शिकायला मिळते . त्या गावात त्याला बाज्या , उस्मान , जालिंदर , पक्या ,सुंदर ,प्रभाकर असे काही मित्र भेटतात . त्यांचे निरनिराळे उद्योग , मित्र प्रेम आणि त्यांचे काही प्रमाणातले उद्योग (फालतु ) आणि त्यामुळे मिळणारे ज्ञान .

जवळच असलेल्या देवधरचे सौंदर्य ,कोकणकडा , तिथले ठाकर आणि त्यांना इंजिन बसवून देण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न ह्याचे वर्णन .
सर्वात महत्वाचे काय असेल तर -ज्या पंडितरावांच्या सांगण्यावरून तो इकडे आलेला असतो त्यांचे व्यावहारिक तत्वज्ञान … आणि त्यांच्यामुळे ओळख झालेले गुरुजी त्यांचे जगण्याचे तत्वज्ञान एकदम मस्त आहे . जे समोर आहे ते करत राहायचे , त्यातून छोटासा का होईना आनंद मिळतोच आणि तो मिळवत राहायचा . मग अशा छोट्या छोट्या पोकळ्या मुजवून आनंद शोधायचा . म्हणजे मोठी पोकळी तयार होतच नाही . ह्या गुरुजींचे जगण्याचे तत्वज्ञान एकदम मस्त आहे हो . भरकटलेल्या जीवाला नक्कीच शांती मिळू शकते . ते खरच खूप छान आहे .
काही काही वर्णन रिपिट केल्यामुळे थोड बहुत कंटाळवाण होतं - जसे की झाडाला फळ मागणे ….
धुंडीमाळ ह्या पंडितरावांच्या प्राध्यापक मित्रामुळे आनंद पुढे सहज म्हणून एम ए करतो आणि त्यांच्याच एका अमेरिकन मित्रामुळे आनंदला पुढे युएस ला जायची संधी मिळते . सोंडूर सोडून जावे लागेल म्हणून होणारी घालमेल पण तरीही नवीन वाट धुंडाळण्यासाठी तो जाण्याचे ठरवतो .ह्या सर्व प्रवासात त्याला गवत्याचे सौंदर्य भुरळ घालते . त्याची निरनिराळी रूपे पाहून व त्यावर असणाऱ्या गुहेत तो आपली दुःख त्रास विसरून जातो .
आपल्याही आयुष्यात अशा छोट्या पोकळ्या असतातच , त्या बुजवण्याचे अनेक मार्ग आहेत . ह्यातील गुरुजींचे तत्वज्ञान आपल्यालाही ह्या पोकळ्या मुजावायला नक्कीच मदत करतील . न ठरवताही आयुष्य एका सुंदर किनाऱ्यावर नेता येते हेच तत्वज्ञान वाचायचे गवत्या मधून 

दुःखाचा अधिकार


उगा बसुनी मऊ गादीवर
अश्रू ढाळीत त्या मरणावर
आठवणींचा जागवत जागर
रडण्यास मजला वेळ नाही
कारण
हे वेड पांघरून झोपण्यास मजकडे गादीच नाही

नुसते खावून बसून कोपऱ्यात
ताट लोटून आयते जगण्यात
बसून बसून सांधे दुखण्यात
दुःख करण्यास मजला वेळ नाही
कारण
माझ्या घरात धान्याचा दाणाच शिल्लक नाही
होते नव्हते सर्व गेले
जबाबदारीचे ओझे झाले
काळ पाहून डोळे सुखले
मित्रमेळे निघून गेले
आसवे ढाळीत बसण्यास मजला सवड नाही
कारण
माझ्या लेकरांची हातातोंडाची गाठच पडणार नाही
नसे गोंजारणारे ते प्रेमळ हात
नाही उरला पातेल्यात भात
करावीच लागेल काही सुरवात
पैशाची माझ्याकडे दमडी नाही
कारण
दुःखाचा मला अधिकारच नाही
©ज्योती पवार

गाई ,म्हैशी ,डुकरे ,कुत्रे ,मांजरे आणि खड्डे-2

मागच्या दोन लेखात मी कुत्रा आणि म्हैशीबद्दल सांगितले .  आता गाय घेवू . आमच्या घरात गाय होतीच -जर्शी गाय .  आई मोठी बादली घेवूनच धार काढायची . दोन हातानी धार बादलीत पडे आणि चिळ चिळ असा आवाज येई ,मज्जा वाटे . एवढ्या मोठ्या बादलीत दुधाचा फेस वर आलेला बघून मजा यायची पण खरे दुखणे तर पुढे होते .
     हे दुध जरी जास्त असले तरी घरी वापरत नसत . कारण ते अगदी पातळ त्यामुळे चहा घट्ट होत नसे . पिण्यासाठी पण याचा वापर नसेच कारण ते पिवळसर दिसे आणि एक विचित्र वास पण येत असे . त्यामुळे सरळ मोठ्या किटलीत भरून डेअरी ला घातले जाई . आता घरात मीच मोठी मग ते डेरीत कोण घालणार ? मी होतेच . कितीही शाळेला उशीर झाला ,काही झाले तरी ती एवढी मोठी किटली वागवत त्या लांब चावडीवर असलेल्या डेरीत जावे लागे आणि किटली ह्या हातातली त्या हातात करून वैताग येई नुसता . वैताग होता नुसता . तिथे पोहचेपर्यंत मी एवढी वाकडी होवून चाले कि आता मी कायमची वाकडीच होणार काय असा भास होई . झाले नाही वाकडी ते सोडा पण अशी भीती वाटेच .
       तेव्हा मी सातवीत होते आणि स्कॉलरशिप च्या परीक्षेला बसले होते . शाळेच्या अगोदर त्याचा क्लास असे , पण दुध घातल्याशिवाय जाता येत नसे . आईला हजारदा सांगूनपण ती लवकर धार काढत नसे त्यामुळे क्लासला उशीर . मग मी उशिरा जाई आणि काही समजतच नसे . मग प्रश्न विचारले कि मला काही येतच नसे ,सगळे मग मला "ढ " च समजत असावे मग . त्याचं फार वाईट वाटे . दोनचारदा बोलून घेतल्यावर मी क्लास सोडला आणि' अर्थातच स्कॉलरशिप ची परीक्षा पण दिली नाही . अभ्यासातून सुटका झाली पण सल माझ्या कायम मनात राहिला .
 तेच पुढे एलिमेंटरीच्या क्लासचे झाले .मग तिलाही नाही बसता आले ,वैताग नुसता . मनातल्या मनात हजार शिव्या त्या गाई ला आणि घरातल्यांना देवून झाल्या .
अधेमध्ये वैरण घाल ,लागवडीच घमेले गाई समोर ठेव असली फुटकळ कामे करावी लागत , सगळ्यात वाईट म्हणजे कोणी आईबाई येवून सांगे ,"गवतर धरा आज "…. झाले ,आई सांगेच तेव्हा लक्ष ठेव जरा . कशावर लक्ष ठेवायच तर गाय कधी …. ? काय हे ? ह्यांचे सोवळे ओवळे होते पण माझी वाट लागते त्याचे काय ? सगळ्यात वाईट म्हणजे गाईला ठेवलेली लागवड शेजारी बांधलेली म्हैस खावू नये म्हणून काठी घेवून उभा राहणे . म्हैस काही ऐकत नसे आणि माझी नुसतीच धडपड … , आई मग रागवत असे तेवढे पण जमत नाही काय म्हणून ?

हा अजून एक -सनासुदीला गाईला नैवेद्य , हे एक प्रकरण माझ्यासाठी वैतागच . आया बाया नैवेद्य घेवून येणार ,गप घमेल्यात देवून जाणार नाहीत तर चला कि जरा मला गाईला पुजायचे आहे असे सांगणार . गाय मारल म्हणून चल ग तू . मग त्यांची साग्रसंगीत पूजा होईस्तोवर तिथे काठी घेवून थांबा . गाईच्या डोक्यालाच कुंकू लावल पाहिजे ,प्रदक्षिणा झाली पाहिजे पण गाईची किवा म्हशीची लाथ बसणार नाही ह्याची काळजी . पूजा गाईची ,श्रद्धा ह्यांची आणि डोकेदुखी माझी .
     नंतर ती गाई मेली आणि तेव्हाच माझी त्या किटली आणि दुधापासून सुटका झाली .

   सगळ्यात भारी म्हणजे आजकाल रस्त्यावर धरणे धरणाऱ्या गाई , किती मोठ्या कळपाने धरणे धरतात त्या . शांत पणे.  काय म्हणणे मागत असतील त्या? पण भीती वाटतेच . चुकून मधूनच आली तर ? आया बाया एवढ्या धार्मिक , प्लास्टिक च्या पिशवीत भरून उरले सुरले रस्त्यावर फेकणार . गाई ते खायला येणार . पूर्ण रस्त्यावर अडवणूक नुसती .
   सगळ्यात भारी किस्सा तर पुढेच आहे . नवीन नवीन गाडी शिकलेले ,इकडे तिकडे वळता सुद्धा येत नसे . एकदा ऑफिस वरून (दमन टू वापी )घरी येताना गाई पुढून पळत येत होती .रस्ता सुनसान .  मला काही सुचेचना . गाडी थांबवली पण कोठे जावू तेच कळेना . मी मध्येच थांबलेली बघून समोरून येणारा माणूस प्रश्नार्थक नजरेने पाहत होता , मी मधूनच ओरडले - गाय ssss , त्याने मागे पहिले आणि वेग वाढवून निघून गेला . आता ? आता नक्की गाय माझ्या अंगावर येणार म्हणून मी चक्क रस्त्याच्या खाली असलेल्या खड्ड्यात गाडी घातली आणि त्यावेळची थरथर -- अजूनपण जाणवतीय . पण गाय तशीच पुढे पळत निघून गेली आणि मी मुर्खासारखी गाडी खड्ड्यात घातली होती . पुढे गाडी काढताच येयीना रस्त्यावर . शेवटी गाडी तशीच ठेवून मी रस्त्यावर . कितीतरी वेळाने ओफिसमधलेच नरेंद्र पाटील आले , त्यांना सांगितले सर्व , मग त्यांनी गाडी काढून दिली आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमधला प्रत्येकजण माझ्याकडे येवून हसत होता . लगेच मुलींच्या ड्रायव्हिंग वरचे जोक … बिचाऱ्या सगळ्या गाडी चालवणाऱ्या  मुली त्यादिवशी माझ्यामुळे चेष्टेचा विषय झाल्या .
   इति गाय पुराण …  ३३ कोटी देवांचे काही दर्शन झाले नाही पण माझा ३३ कोटी वेळा अपमान मात्र झाला.

विंचुर्णीचे धडे- गौरी देशपांडे

विंचुर्णीचे  धडे
गौरी देशपांडे

आता आता पर्यंत मी गौरी देशपांडेंचे एकही पुस्तक वाचले नव्हते पण पहिले वाचले ते विंचुर्णीचे धडे . कदाचित आपण ज्या वातावरणात राहिलो ,वाढलो त्याच वातावरणातील साहित्य वाचलं कि भावते मनाला तसच काहीसं विंचुर्णीचे धडे वाचून वाटले . आजूबाजूला तशीच डिट्टो माणसे दिसतील . सगळ्यात जास्त आवडली ती गौरीची एकलेपणाची आस . शहरात राहणाऱ्या माणसांना खेडे फक्त चारच दिवस बरे वाटते पण नंतर कंटाळा येतो . पण तसे न होता ,असे एकटे तेही उजाड दुष्काळी भागात राहणे ,तिथेही आपली जगण्याची स्टायील न बदलणे .

एकलेपणाची आस लागली हृदया
अन दाट पसरली प्रसन्नतेची छाया !

वा असा एकटेपणाचा  सुंदर विचार , अनुभवावा असे वाटून गेले ,पेलवेल कि नाही माहित नाही पण स्पर्शून गेला नक्कीच .
सगळ्यात आवडली ती बिनधास्त गौरी . रिक्षावाल्या काकाला थोडा वेळ थांबायला सांगून रमची बाटली विकत घेणारी गौरी मला ग्रेटच वाटली , त्याही पुढे जावून "प्यायची लाज वाटत नाही  तर दाखवायची कशाला वाटेल ?" असे म्हणून ती बाटली हातातून घेवून जाणारी गौरी . आतून बाहेरून पारदर्शक . अजूनही दुकानासमोरून जातानाही भीती वाटणाऱ्या मला ,"गौरीच्या स्वातंत्र्याच्या व्याख्या कशा असतील याची कल्पनाच आली ".
बहिण आणि तिचे मिस्टर यामुळे तिने विंचुर्णीचे घर बांधले खरे पण तिथल्या माणसांना आपलेसे करणे ,त्यांचे विचार बदलणे सोपे नव्हतेच ,नसतेच हेच सत्य शेवटी उमजून येते .  कारण सवयी बदलत नसतात . तिच्या स्वतःच्या तरी कुठे बदलल्या . पण तरीही लोकांना वागण्यातून बदल शिकवणारी गौरी खूपच आवडली .
उन्हातानात उभं राहून बांधलेलं घर ,त्याची मनाप्रमाणे केलेली बांधणी ,तिथल्या जनजीवनाशी केलेली तडजोड ,विंचुर्णीचा दुष्काळ , तिथले विंचू ,त्यांचे निरीक्षण , पाझर तलाव , शेळ्या मेंढ्या , त्यांची उस्तवारी मस्त आहे अगदी . धामण ,साप ,गोमा यांचा सहवास आणि त्याबरोबरच एकटे राहणे . एवढे देश विदेश फिरून पण असा सुख सोई नसलेल्या भागात येवून राहणारी ,तिथेच जास्त रमणारी गौरी , अफलातून अजब रसायन नक्कीच आहे असे वाटून जाते . वयाची वीस वर्षे खेड्यात राहून पण गावाकडे गेल्यावर तिथे थोड्या कमी असलेल्या सुख सुविधेवर आपण बोलतो याची कीवच वाटली मला हे पुस्तक वाचून .  लाईट च्या झगमगाट अनुभवून नंतर बारा तासाचे भारनियमन अनुभवने केवळ अशक्य पण एकलेपनाची आस असली कि सारे जमत असावे बहुधा .
तिथल्या मांजरा कुत्र्यांची इंग्लिश नावे मस्त आणि ती तशी का ठेवली ह्याचे किस्से तर अगदीच मस्त . नानी ,गोरख , तिथले निंबाळकर ,मुकुल ह्यांच्या कहाण्या तर मनाला विचार करायला भाग पडणाऱ्या .

प्रथम विंचुर्णीत राहायला आल्यावर आदर्शवादाचे रोमांटिक तारे ,नवलाईचे घर ,वावर ,सभोवतालचे अथांग क्षितीज ,समोर
सळसळणारा तलाव आणि त्यात डुंबनारी नाव ,सूर्योदय -सूर्यास्त ,लोकांचे भले करण्याचा आशावाद ह्याने हुरळून गेलेली गौरी नंतर त्यातून झालेल्या मनस्तापाबद्दल हुळहूळणारी गौरी . छोट्या छोटया गोष्टीसाठी लागणाऱ्या कष्टाची जाण आली पण जीव रमला तो तिथेच हे कबुल करणारी ,आपल्या परीने आनंद शोधणारी खूप आवडली मला आणि हे पुस्तकही .


भग्न

लावूनी असे वेड ,स्वप्ने ती पहिली
मोडून तीच स्वप्ने , भंगले हृदय माझे

दाखवून स्वप्ने मज , वाट माझी बांधिली
तुडवूनी तीच वाट , सालटले पाय माझे

चालून त्या वाटेवरी , आशा मी शोधिली
करुनी वाट काटेरी , रक्ताळले पाय माझे

धरून त्या आशेला , घरटी मी विणली
बांधून त्या घरट्याला , निवले मन माझे

राहून त्या घरटयात , प्रीती मी जपली
तोडून त्याच प्रीतीला , फुटले बांध माझे

जपून त्या आठवणी , रात माझी झरली
शोधून आधार रातीचा , भग्न मी जाहले


©ज्योती पवार

Thursday, June 25, 2015

फेसबुकच्या हस्ती


फेसबुकच्या ह्या  प्रसिद्ध हस्ती
भाषेवर यांचे प्रभुत्व असती

सतत कोणास देतील चिमटे
कुचाळक्या आणि रिकामे खटके

बाईच्या कपडयावर सतत नजर
नेत्र सुख घेताना नेहमीच हजर

भल्या भल्या बायांची यांना साथ
बाया आहेत यांच्याच खिशात

भाषेत यांच्या बिभस्त्स रस
बरेच  वाचतात चवीने खास

दाखवतात हे भलतेच हुशार
वेळ आली कि होतात पशार

धर्माचा यांवर आहे पगडा
दुसऱ्या धर्मास समजे बेगडा

चेले यांचे आहेत हजार
मखलाशी ती बेसुमार

आत छुपा भरलाय कार 
दुसऱ्यावर मागून वार

भरडतात हे दुसऱ्या
गोष्टी करून हसऱ्या

कंपूशाही देते साद
घोडदौड यांची आझाद