Monday, June 29, 2015

विंचुर्णीचे धडे- गौरी देशपांडे

विंचुर्णीचे  धडे
गौरी देशपांडे

आता आता पर्यंत मी गौरी देशपांडेंचे एकही पुस्तक वाचले नव्हते पण पहिले वाचले ते विंचुर्णीचे धडे . कदाचित आपण ज्या वातावरणात राहिलो ,वाढलो त्याच वातावरणातील साहित्य वाचलं कि भावते मनाला तसच काहीसं विंचुर्णीचे धडे वाचून वाटले . आजूबाजूला तशीच डिट्टो माणसे दिसतील . सगळ्यात जास्त आवडली ती गौरीची एकलेपणाची आस . शहरात राहणाऱ्या माणसांना खेडे फक्त चारच दिवस बरे वाटते पण नंतर कंटाळा येतो . पण तसे न होता ,असे एकटे तेही उजाड दुष्काळी भागात राहणे ,तिथेही आपली जगण्याची स्टायील न बदलणे .

एकलेपणाची आस लागली हृदया
अन दाट पसरली प्रसन्नतेची छाया !

वा असा एकटेपणाचा  सुंदर विचार , अनुभवावा असे वाटून गेले ,पेलवेल कि नाही माहित नाही पण स्पर्शून गेला नक्कीच .
सगळ्यात आवडली ती बिनधास्त गौरी . रिक्षावाल्या काकाला थोडा वेळ थांबायला सांगून रमची बाटली विकत घेणारी गौरी मला ग्रेटच वाटली , त्याही पुढे जावून "प्यायची लाज वाटत नाही  तर दाखवायची कशाला वाटेल ?" असे म्हणून ती बाटली हातातून घेवून जाणारी गौरी . आतून बाहेरून पारदर्शक . अजूनही दुकानासमोरून जातानाही भीती वाटणाऱ्या मला ,"गौरीच्या स्वातंत्र्याच्या व्याख्या कशा असतील याची कल्पनाच आली ".
बहिण आणि तिचे मिस्टर यामुळे तिने विंचुर्णीचे घर बांधले खरे पण तिथल्या माणसांना आपलेसे करणे ,त्यांचे विचार बदलणे सोपे नव्हतेच ,नसतेच हेच सत्य शेवटी उमजून येते .  कारण सवयी बदलत नसतात . तिच्या स्वतःच्या तरी कुठे बदलल्या . पण तरीही लोकांना वागण्यातून बदल शिकवणारी गौरी खूपच आवडली .
उन्हातानात उभं राहून बांधलेलं घर ,त्याची मनाप्रमाणे केलेली बांधणी ,तिथल्या जनजीवनाशी केलेली तडजोड ,विंचुर्णीचा दुष्काळ , तिथले विंचू ,त्यांचे निरीक्षण , पाझर तलाव , शेळ्या मेंढ्या , त्यांची उस्तवारी मस्त आहे अगदी . धामण ,साप ,गोमा यांचा सहवास आणि त्याबरोबरच एकटे राहणे . एवढे देश विदेश फिरून पण असा सुख सोई नसलेल्या भागात येवून राहणारी ,तिथेच जास्त रमणारी गौरी , अफलातून अजब रसायन नक्कीच आहे असे वाटून जाते . वयाची वीस वर्षे खेड्यात राहून पण गावाकडे गेल्यावर तिथे थोड्या कमी असलेल्या सुख सुविधेवर आपण बोलतो याची कीवच वाटली मला हे पुस्तक वाचून .  लाईट च्या झगमगाट अनुभवून नंतर बारा तासाचे भारनियमन अनुभवने केवळ अशक्य पण एकलेपनाची आस असली कि सारे जमत असावे बहुधा .
तिथल्या मांजरा कुत्र्यांची इंग्लिश नावे मस्त आणि ती तशी का ठेवली ह्याचे किस्से तर अगदीच मस्त . नानी ,गोरख , तिथले निंबाळकर ,मुकुल ह्यांच्या कहाण्या तर मनाला विचार करायला भाग पडणाऱ्या .

प्रथम विंचुर्णीत राहायला आल्यावर आदर्शवादाचे रोमांटिक तारे ,नवलाईचे घर ,वावर ,सभोवतालचे अथांग क्षितीज ,समोर
सळसळणारा तलाव आणि त्यात डुंबनारी नाव ,सूर्योदय -सूर्यास्त ,लोकांचे भले करण्याचा आशावाद ह्याने हुरळून गेलेली गौरी नंतर त्यातून झालेल्या मनस्तापाबद्दल हुळहूळणारी गौरी . छोट्या छोटया गोष्टीसाठी लागणाऱ्या कष्टाची जाण आली पण जीव रमला तो तिथेच हे कबुल करणारी ,आपल्या परीने आनंद शोधणारी खूप आवडली मला आणि हे पुस्तकही .


No comments:

Post a Comment