Monday, June 29, 2015

गवत्या (मिलिंद बोकील )

गवत्या
मिलिंद बोकील
मौज प्रकाशन
गवत्या हा सह्याद्रीतला एक डोंगर .सोंडूर गावात हा डोंगर आहे . उगवणाऱ्या गवतावरून त्याचे गवत्या हे नाव . हा डोंगर जरी ह्या कथेचा नायक दाखवला असला तरी आनंद हा ह्या कथेचा खरा नायक आहे. तब्बल ४१० पानातून आनंद हा नायक आयुष्य निर्भेळ आनंदाने कसे जगायचे त्याहीपेक्षा आपण ते जगतच असतो हेच सांगत राहतो.
आनंदला आयुष्यात नक्की काय करायचे असते ते माहित नसते त्यामुळेच कोणतेही ध्येय न ठेवल्याने कोणत्याच गोष्टीत त्याचे मन रमत नसते . फक्त सरळमार्गी आयुष्य जगणे , नोकरी करणे ,त्यात मन नाही रमले की ती सोडून देणे असे उद्योग तो करत असतो. त्यामुळेच मुंबई सारख्या ठिकाणी राहून पण त्याचे मन ह्या गर्दीत रमत नसते . त्याच्यावर त्याच्या बालमैत्रीण अनुच्या प्रेमाचाही काही उपयोग होत नाही . अशा ह्या निराशेतून तो सोंडूर ह्या गावी गांधीच्या आदर्शानुसार चालणाऱ्या केंद्रात येतो .केंद्र चालवणारे घारपुरे , मुकणे , जी डी , शाळा , ब्रम्हे मास्तर . प्रत्येकाकडून त्याला काही नवीन शिकायला मिळते . त्या गावात त्याला बाज्या , उस्मान , जालिंदर , पक्या ,सुंदर ,प्रभाकर असे काही मित्र भेटतात . त्यांचे निरनिराळे उद्योग , मित्र प्रेम आणि त्यांचे काही प्रमाणातले उद्योग (फालतु ) आणि त्यामुळे मिळणारे ज्ञान .

जवळच असलेल्या देवधरचे सौंदर्य ,कोकणकडा , तिथले ठाकर आणि त्यांना इंजिन बसवून देण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न ह्याचे वर्णन .
सर्वात महत्वाचे काय असेल तर -ज्या पंडितरावांच्या सांगण्यावरून तो इकडे आलेला असतो त्यांचे व्यावहारिक तत्वज्ञान … आणि त्यांच्यामुळे ओळख झालेले गुरुजी त्यांचे जगण्याचे तत्वज्ञान एकदम मस्त आहे . जे समोर आहे ते करत राहायचे , त्यातून छोटासा का होईना आनंद मिळतोच आणि तो मिळवत राहायचा . मग अशा छोट्या छोट्या पोकळ्या मुजवून आनंद शोधायचा . म्हणजे मोठी पोकळी तयार होतच नाही . ह्या गुरुजींचे जगण्याचे तत्वज्ञान एकदम मस्त आहे हो . भरकटलेल्या जीवाला नक्कीच शांती मिळू शकते . ते खरच खूप छान आहे .
काही काही वर्णन रिपिट केल्यामुळे थोड बहुत कंटाळवाण होतं - जसे की झाडाला फळ मागणे ….
धुंडीमाळ ह्या पंडितरावांच्या प्राध्यापक मित्रामुळे आनंद पुढे सहज म्हणून एम ए करतो आणि त्यांच्याच एका अमेरिकन मित्रामुळे आनंदला पुढे युएस ला जायची संधी मिळते . सोंडूर सोडून जावे लागेल म्हणून होणारी घालमेल पण तरीही नवीन वाट धुंडाळण्यासाठी तो जाण्याचे ठरवतो .ह्या सर्व प्रवासात त्याला गवत्याचे सौंदर्य भुरळ घालते . त्याची निरनिराळी रूपे पाहून व त्यावर असणाऱ्या गुहेत तो आपली दुःख त्रास विसरून जातो .
आपल्याही आयुष्यात अशा छोट्या पोकळ्या असतातच , त्या बुजवण्याचे अनेक मार्ग आहेत . ह्यातील गुरुजींचे तत्वज्ञान आपल्यालाही ह्या पोकळ्या मुजावायला नक्कीच मदत करतील . न ठरवताही आयुष्य एका सुंदर किनाऱ्यावर नेता येते हेच तत्वज्ञान वाचायचे गवत्या मधून 

No comments:

Post a Comment